माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
सांडपाणी,अस्वच्छता आणि दुर्गंधीचा विळखा हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील (एका वॉर्डाचे) भयंकर वास्तव बनले आहे… गेल्या दीड वर्षांपासून एका तीन मजली इमारतीतून थेट अर्धवट नाल्यात सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी, पाणी साचणे, आणि रोगराईचा उद्रेक झाला आहे. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संकटाकडे प्रशासनाचे ठाम दुर्लक्ष!
या वॉर्डातील नाला केवळ अपूर्णच नाही, तर त्याचा लेआउटही नशल्याने सांडपाण्याचा निचरा होण्याचा कोणताही मार्ग नाही. परिणामी, घरांच्या उंबरठ्यापर्यंत साचलेल गटारपाणीchi दुर्गंधी आता नागरिकांच्या आरोग्याचा घात करत आहे. डेंग्यू, मलेरिया, त्वचाविकार आणि अन्य साथी आजारांचा धोका दारात उभा आहे. ही स्थिती केवळ “अस्वच्छता” नाही – ही थेट जीवनमरणाचा प्रश्न आहे.
या संकटापासुन काही स्थानिकांनी स्वतःच्या आरोग्याचा संरक्षण करीता नाल्यात माती टाकून सांडपाणी रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नालाही प्रशासनाने “गैरकायदेशीर” ठरवून अडवले. हा प्रकार नागरिकांच्या इच्छाशक्तीचा अपमान आहे आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचं बिंबक आहे.
मागण्या – रास्त आणि तातडीच्या !
1. सांडपाण्याचा त्वरित निचरा मोटरपंपाद्वारे करणे.
2. डीडीटी पावडर आणि फॉगिंग मशीनने सातत्याने फवारणी करणे.
3. नियमित सफाईसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
4. नाल्याचं काम तात्काळ पूर्ण करणे.
5. बेकायदेशीर सांडपाणी सोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई.
या मागण्या केवळ योग्यच नव्हे, तर किमान मानवी गरजांचे प्रतिबिंब आहेत.माणगावकरांचे संयमाचे धागे आता सुटत चालले आहेत. जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर लोक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग पत्करणार हे निश्चित आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.शेवटी एक सवाल – नगरपंचायतीचे अधिकारी अजून किती झोपेत राहणार?लोकांचे आरोग्य धोक्यात असताना, त्यावर पांघरूण घालणाऱ्या प्रशासनाची ही गप्पी जबाबदारीची थेट थट्टा आहे. माणगाव नगरपंचायतीला एकच स्पष्ट संदेश – “तुमची निष्क्रीयता माणसांच्या जिवाशी खेळते आहे. जागे व्हा, नाहीतर जनतेचा रोष तुम्हाला झोपू देणार नाही!”