जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ ला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या उपक्रमांतर्गत पी उत्तर विभागातील मालाड पश्चिम येथील बिलाबाँग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. या अभियानांतर्गत झाडांभोवतीचे सिमेंट काँक्रीट हटवणे, झाडांवर ठोकलेले खिळे, केबल्स, पोस्टर, जाहिरात फलक काढणे, वृक्षांभोवती लालमाती टाकणे यासारख्या विविध कृती केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे झाडांना मोकळा श्वास घेता येतो, तसेच त्यांच्या नैसर्गिक वाढीसाठी आवश्यक आधार मिळतो. उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शहरातील २४ विभागांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वृक्षसंवर्धनासाठीचे कार्य सुरू राहणार आहे. मालाड पश्चिम येथील जनकल्याण नगर भूमी पार्क एएलएम मध्ये आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिकांसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक उद्यान अधिक्षक योगेंद्रसिंग कच्छावा यांनी ‘ताम्हण’ (महाराष्ट्राचे राज्य वृक्ष) प्रजातीची १० झाडे लावल्याची माहिती दिली. याचबरोबर विद्या सहाय्यक प्रमोद इंगळे यांनी झाडांना होणाऱ्या हानीबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जनजागृती केली. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असून, वृक्ष संरक्षणाच्या कामात सामूहिक सहभाग दिसून येत आहे. ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ ही मोहीम केवळ झाडांचे रक्षण नव्हे तर भविष्यासाठी हरित वारसा निर्माण करण्याचे काम करत आहे.