रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):-
रोहा येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला चांगला उत्साह दिसून आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक राजेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. देश सध्या ज्या संकटातून जात आहे, त्यातून भारताची खरी मुक्तता कशी करावी, यावर त्यांनी जोर दिला. विशेषतः तरुणांनी काँग्रेसमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस जिल्हा चिटणीस मिलिंद पाडगावकर, रोहा तालुक्याचे सुनिल देशमुख,उपाध्यक्षजिल्हा समीर सकपाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, पर्यावरण विभागाचे तालुका अध्यक्ष मारुती फाटक उपस्थित होते. या कार्यक्रमात रोहा, सुधागड, पोलादपूर व माणगाव भागातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या बैठकीत बिलाल पानसरे, समीर अधिकारी, फैजल अधिकारी, पांडुरंग देशमुख, संतोष सावंत, गोविंद साळवी, गणेश देशमुख, गजानन चव्हाण, गणेश पवार यांसारखे अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपूर्ण बैठक संध्याकाळी सात ते आठ या वेळेत संयम व शिस्तीने पार पडली…
या बैठकीत काँग्रेसच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदावर संभाव्य बदलासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, आणि आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाची पुनर्रचना कशी करावी, याबाबत सखोल चर्चा झाली. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.
एकूणच, रोह्यातील ही काँग्रेसची आढावा बैठक ही फक्त चर्चेसाठी नव्हे तर संघटनेच्या मजबुतीसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. आता दक्षिण रायगडच्या काँग्रेस नेतृत्वात काय बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.