पोलादपूर शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून रविवारी सकाळच्या सुमारास एका दुर्दैवी अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड ते पोलादपूर दरम्यान महाड औद्योगिक वसाहतीतून रात्रपाळीची नोकरी करुन वैभव पालकर यांनी गाडीचालक प्रमोद कदम यांच्याकडे लिफ्ट मागून आज सकाळी साडे सातच्या सुमारास पोलादपूरच्या दिशेने जात असताना लोहारे येथील पेट्रोल पंपच्या समोर एका अज्ञात आयशर ट्रकने एक्टिवा क्रमांक MH06 BR 4627 या दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील वैभव रमेश पालकर उर्फ राजू पालकर (रा. आनंद नगर पोलादपूर ) या इसमाचा जागीच मृत्यू झाला…तर दुचाकी चालक प्रमोद कदम हे (राहणार भोगावं पोलादपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.मदत घेत मागून मोटारसायकलवरून परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवर मागील बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलादपूर तालुक्यातील अनेक तरुण महाड औद्योगिक वसाहतीत नोकरीदरम्यान ये-जा करताना जीवाला मुकले आहेत.
यावेळी धडक देऊन ट्रक चालक पसार झाला. यानंतर लोहारे येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन जखमी मोटारसायकलस्वाराची विचारपूस केली असता त्याने मयत व्यक्ती परिचयाचा असल्याचे सांगून तो पोलादपूर आनंदनगर येथील वैभव रमेश पालकर असल्याची माहिती दिली. लोहारे येथील ग्रामस्थांनी पोलादपूर शहरातील संबंधितांना कळविले असता पोलादपूरमधील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वैभव पालकर याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह पाठविण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार नितेश कोंडाळकर,पोलीस हवालदार रवींद्र सरणेकर,पोलीस हवालदार तुषार सुतार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातास कारणीभूत असणाऱ्या अज्ञात आयशर ट्रकचा शोध पोलादपूर पोलिसांकडून सुरु असून पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने- आण करण्यासाठी एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध केली नसल्याने अनेक तरुणांचा नोकरीला जाताना अथवा परतताना अपघाती मृत्यू झाला आहे. असूनही महाड एमआयडीसीतील कारखानदारांनी अनेक वर्षांपासून अद्याप नोकरदारांची व कामगारांची वाहतुकसुविधा उपलब्ध केली नसल्याने उदरनिर्वाहासाठी रोजंदारी करणाऱ्यांच्या जीवावर बेतण्याच्या दुर्दैवी घटनांचे दरवर्षी सातत्य दिसून येत आहे.