खारेपाटातील २८ गाव शेतकऱ्यांचा १५ मे रोजी आक्रोश मोर्चा… हजारोंच्या संख्येने देणार एमआयडीसी कार्यालयावर धडक… 

0
18

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पुर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी ३५६ कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतून पाईपलाईन जाणार आहे…त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असून याविरोधात शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख  राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर धडक देणार आहे.

प्रकल्पासाठी एकरी ९६ लाख ६९ हजार तर हेक्टरी २ कोटी ४१ लाखांचा दर देऊ केला आहे…तर ज्यांच्या जमीनीतून ही पाईप लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांशी एक शब्दाची चर्चाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही…या विरोधात येथील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा डाव असल्याचे म्हणणे संघटनेचे अध्यक्ष राजाभाई केणी यांचे आहे. आंदोलना दरम्यान कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास एमआयडीसी विभाग जबाबदार असेल,असा इशारा देखील राजाभाई केणी यांनी दिला आहे…प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण एमआयडीसी फेज टू अंतर्गत ७३६ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या २८ किलोमीटर लांबीची भली मोठी पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी १६७ कोटी ०८ लाख २५ हजार २५४ रुपये खर्चुन पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे १८९ कोटी ७० लाख ३५ हजार ३२६ रुपये खर्चुन जॅकवेल बांधली जाणार आहे. यासाठीची मोजणी करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने निविदा प्रक्रिया पुर्ण केली. तरीही याबद्दल कोणतीही कल्पना पाईपलाईनने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी शेतकरी संघटना खारेपाट विभाग या संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले आहे…