मुंब्रा-पनवेल रोड ठप्प…महामार्गावर जीवघेणी वाहतूककोंडी… अवकाळी पावसाचे पाणी,रस्त्यावर भंगाराच्या गाड्यांवर वरदहस्त कोणाचा ?

0
21

चौदा गाव शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पावसाळा सुरू होताच मुंब्रा-पनवेल महामार्गावरील पिंपरी येथील गौसिया मार्केट परिसरात पुन्हा एकदा तीव्र वाहतूक कोंडीचा प्रश्‍न डोके वर काढतोय…या परिसरात रस्त्यावर साचलेले पाणी,गटारातील दुर्गंधीयुक्त कचरा,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अवैधपणे उभ्या असलेल्या भंगाराच्या गाड्या, यामुळे पूर्ण मार्ग ठप्प होतोय.

स्थानिक नागरिक आणि दुकानदार अक्षरशः हैराण झाले आहेत…पावसाचा जरा सुद्धा जोर झाला, की संपूर्ण रस्ता जलमय होतो.दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका हा  पिंपरी येथील गौसिया मार्केटसह स्थानिकांना बसला असून पुढील भर पावसाळ्याचे काय ? असा सवाल स्थानिक करीत आहेत…पावसाळा जवळ आला तरी नालेसफाई आणि गटार सफाईचं काम गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प असून, त्याकडे नगरपालिका, किंवा स्थानिक प्रशासन तसेच IRB यंत्रणांचं दुर्लक्ष दिसून येत आहे…

या भंगार गाड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या गाड्या केवळ रस्त्यावर अडथळा निर्माण करत नाहीत, तर त्या आजूबाजूच्या व्यापाऱ्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी धोकादायकही ठरत आहेत…काही गाड्यांमध्ये ज्वलनशील वस्तू असल्याची शक्यता असून, यामुळे आग लागण्याचाही धोका निर्माण झाला आहे… विशेष म्हणजे या गाड्यांची कोणतीही तपासणी अथवा कारवाई प्रशासनाच्या वतीने केली जात नाही…

या वाहतूक कोंडीमुळे ऍम्ब्युलन्ससारखी आपत्कालीन वाहनेही वेळेवर पोहोचू शकत नाहीत. रोजच्या रोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा पोलीस आणि IRB यांच्याकडे तक्रारी करूनही काहीच फरक पडलेला नाही.आता या समस्येकडे स्थानिक आमदारांनी आणि महापालिकेने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. भंगार गाड्यांवर त्वरित कारवाई, नालेसफाई, रस्त्यांची सुधारणा आणि वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्याशिवाय पिंपरीतील गौसिया मार्केटचा प्रश्न सुटणार नाही.संपूर्ण परिसरातील जनतेचा आता एकच आवाज ‘कारवाई करा,अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल!’