माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे गेली अनेक वर्षे रस्त्यावर खड्डे, वारंवार होणारे अपघात,तासन्तासांची वाहतूक कोंडी आणि त्यातून होणारी आर्थिक हानी या सगळ्याने रायगड जिल्ह्यातील जनतेचे धैर्य संपत चालले असतानाच माणगाव शहरातील प्रचंड वाहतुकीची समस्या आता गंभीर व जटिल रूप धारण करू लागली आहे…या समस्येला वाचा फोडण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे यांनी “उपोषण” या हत्याराचा आसरा घेतला आहे…त्यांना पाठिंबा देताना ज्येष्ठ नेते सदानंद येळवे यांनी बिनशर्त साथ जाहीर केली आहे.
रविवारी सायंकाळी उशिरा पत्रकारांशी बोलताना येळवे म्हणाले, “८१ वर्षांच्या या वयात मला मतांच्या राजकारणाची गरज नाही; पण या महामार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाचे अश्रू माझ्या काळजावर कोरले गेले आहेत. विलासभाऊंच्या उपोषणाच्या मागण्या एक टक्काही अयोग्य नाहीत…त्या लोकशाहीचा आत्मा आहेत. मी त्यांच्या पाठीशी कायम उभा राहणार आहे.”
सुर्वे यांचा निर्धार आणि नागरिकांची एकजूट प्रशासन व सरकारसाठी धोक्याची घंटा ठरताना दिसत आहे.आज येळवे सुर्वे तसेच माणगाव व्यापारी संघटना या तीन पिढ्यांचे हात एकत्र आले आहेत;हा क्षण केवळ बातमी राहत नसून व्यवस्थेला हादरवणारा इशारा ठरत आहे.“लोकशाहीची खरी परीक्षा हीच जनतेच्या उपोषणाला उत्तर देणारे लोकप्रतिनिधी खरोखर ‘प्रतिनिधी’ आहेत का केवळ सत्तास्थानी बसलेले प्रेक्षक?”माध्यमप्रतिनिधींचा हा प्रश्न सरकारपुढे ठेवण्यात आला आहे.
माणगावच्या रस्त्यावरून एकच आवाज:“आम्हाला या वाहतूक कोंडीपासून मुक्ती द्या, आश्वासने नव्हे!”सदानंद येळवे यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे हा आवाज आता अधिक बळकट झालेला असून,हे आंदोलन केवळ महामार्गासाठी नव्हे तर शासन-प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणारा नवा मैलाचा दगड ठरेल, असा स्थानिकांचा ठाम विश्वास आहे. माणगावकरांचे घोषवाक्य स्पष्ट आहे…वाहतूक कोंडीमुक्त,सुरक्षित आणि सुकर प्रवास हा मूलभूत हक्क आहे; सौजन्याची भीक नव्हे!