माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
मुंबई-गोवा महामार्गावर मागील २३ दिवसांपासून सुरू असलेली तीव्र वाहतूक कोंडी माणगाव परिसरातील जनजीवनासाठी मोठं संकट बनली आहे.पूर्वी केवळ शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी जाणवणारी ही कोंडी,आता दररोजचीच झाली आहे.मात्र,प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांचा ओघ अचानक का वाढला?
या प्रश्नाचं उत्तर थोडं व्यापक आहे.सध्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुमारे ९०% पूर्ण झालं आहे.त्यामुळे मध्य व तळ कोकणात जाणारे अनेक वाहनचालक आता पारंपरिक पुणे-बेंगळुरू सुपरहायवेचा मार्ग टाळून मुंबई-गोवा महामार्ग वापरत आहेत…परिणामी, विशेषतः कोल्हापूरमार्गे जाणाऱ्यांचा ओघ आता माणगावमार्गे वळला असून,वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि यात भर पर्यंटक यांचे.
सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत मोठ्या ट्रक, पर्यटकांच्या गाड्या, खाजगी वाहनं आणि बसेसचा सततचा ओघ सुरू असतो.याचा थेट परिणाम म्हणजे माणगाव शहरातील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत.बाजारपेठा ठप्प असून, ग्राहक दुकाने गाठू शकत नाहीत. परिणामी व्यवसायांवरही मोठा आर्थिक फटका बसत आहे.
वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणारे कर्मचारी, रुग्णवाहिका, कार्यालयात जाणारे नागरिक, बाजारात येणारे खरेदीदार कोणताही प्रवासी वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांना केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक त्रासही मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे.
काही जणांना वाटत होतं की अवकाळी पावसामुळे कदाचित थोडा दिलासा मिळेल, पण पावसाचा जोर ओसरल्यानंतर कोंडी पुन्हा तीव्रतेने सुरू झाली आहे. अधिकच त्रासदायक बाब म्हणजे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत पायाभूत सुविधा जसं की बायपास, ओव्हरब्रिज, सर्व्हिस रोड आणि नाल्यांचं काम अत्यंत संथगतीने चालू आहे किंवा रखडलेलं आहे.
ही परिस्थिती आता माणगावकरांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे नागरिकांचं स्पष्ट मत आहे की ही केवळ वीकएंड किंवा सुट्टीची समस्या नसून, वाढलेल्या वाहनांच्या सततच्या ओघामुळे निर्माण झालेला गंभीर प्रश्न आहे.
आज माणगाव जणू वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकून गेला आहे.त्यामुळे केवळ तात्पुरते नव्हे, तर कठोर आणि ठोस उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. अन्यथा, येणाऱ्या काळात ही कोंडी अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते.