रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-
भारतीय सैन्यात मायभूमीच्या रक्षणासाठी व तिरंग्याच्या सन्मानासाठी सेवेत असणे ही एक मोठी अभिमानाची व देशाभिमानी बाब आहे.रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून अनेक तरुण मोठ्या प्रेरक व देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देतात.पाली येथील साजिद लूखमान शेख यांनी देखील देशासाठी सर्वस्व योगदान दिले. ते आपली 17 वर्ष देशसेवा व कर्तव्ये बजावून मायभूमीत परतलेल्या साजिद शेख यांची पाली येथे छ. शिवाजी महाराज चौक – गांधी चौक , खालचा मोहल्ला अशी भव्य गौरव मिरवणूक काढण्यात आली. या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास पाली सुधागड व रायगडातील आजी माजी सैनिक, देशप्रेमी नागरिक, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साजिद शेख यांनी सेवेत असतानाचे थरारक अनुभव कथन केले. तर सैन्यात असताना सीमेवर मायभूमीची निस्सीम सेवा केली आहेच पण आता सेवानिवृत्ती नंतर देखील सामाजिक व सेवाभावी कार्यातून मायभूमीची सेवा करीतच राहणार असल्याचे साजिद लूखमान शेख यांनी सांगितले.