उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील जासई येथील उड्डाण पुलालगत व्यावसायिकांनी गाळे धारकांनी,गॅरेज, सव्हीॅअस सेंटर यांनी बेकायदेशीर मुरुम मातीचा भराव केल्याने येथील नैसर्गिक नाल्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. परिणामी जासई येथील राज्य महामार्ग ५४ चा काही भाग पाण्याखाली आला आहे. त्यामुळे या मार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून पावसाळ्यात अपघाताची शक्यता बळावली आहे.उरण, नवीमुंबई व पनवेल तालुक्याला जोडणाऱ्याा जासई नाक्यावर रात्री अपरात्री सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जेएनपीए बंदराच्या माध्यमातून उरण, नवी मुंबई – पनवेल शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग ५४ चे अनेक अडचणीतून रुंदीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटीने उड्डाण पुलाची निमित्ती केली. मात्र नॅशनल हायवे अथॉरिटीच्या नियोजन शून्य कारभारामुळे सदरच्या उड्डाण पुलावर अपघाताची मालिका सुरु झाली असून निष्पाप प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
त्यात काही व्यवसायिकांनी उड्डाण पूलालगत मुरुम मातीचा भराव टाकून या ठिकाणावरील नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारे नाले, स्त्रोत बंद बुजवून आपला व्यवसाय सुरु केला आहे.परिणामी या भागात तसेच रस्त्यावर पाणी साठून राहत आहे.पाऊस पडताच उड्डाण पूलालगत असलेल्या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे.त्याचा त्रास हा प्रवाशी वाहनांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण राहिली तर पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचा संभव आहे.अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.