अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायत ही एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते… मात्र गेल्या दोन वर्षांपासून या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अॅड. मनोज ओव्हाळ यांनी केला केला आहे.याबाबत माहिती देताना अॅड. मनोज ओव्हाळ यांनी सांगितले की, 2 मे रोजीच्या तहकूब ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचा जमाखर्च वाचण्यात आला. त्यात तफावत आढळून आली. गावातील एक रस्ता एका व्यक्तीने स्वखर्चातून केला होता, मात्र या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे 2 लाख 67 हजार देयक कोणत्या आधारे अदा करण्यात आले आहे, याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना विचारणा केली असता सदर काम हे आपल्या काळात झालेले नाही. ते काम पूर्वी झालेले आहे. तसेच ग्रामसभेत रेकाॅर्ड दाखविण्याची तरतुद नसल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात पहाता येतील असे आश्वासन दिले. मात्र दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले असता आपण पंचातय समिती कार्यालयात कामानिमित्त असल्याचे सांगून ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात आलेच नाही.त्यामुळे ग्रामसेवकांना जाणूनबुजून ग्रामस्थांना ही कागदपत्र दाखवायची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ओव्हाळ यांनी केला आहे.ही ग्रामनिधीची चोरी आहे. ग्रामपंचायतीसाठी चाैदावा व पंधरावा वित्त आयोगाचा निधी व त्याचा विनियोग याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. ग्रामनिधीबाबत भ्रष्टाचार झाला असून त्यातून ग्रामपंचायतीचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला जाब विचारण्यात येत असल्याचे अॅड. ओव्हाळ यांनी सांगितले.
यासंदर्भात माहितीसाठी मागितलेली कागदपत्रे ग्रामसेवकांकडून देण्यास टाळाटाळ होत असल्याने बुधवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या मांडला होता.यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रोशन चंद्रकांत भगत , माजी सरपंच अॅड मनोज ओव्हाळ , माजी सदस्य अवधूत पाटील , माजी सदस्य उत्तम पाटील, सचिन पाटील, नीलेश पाटील, सागर पाटील, गणेश पाटील, विनोद म्हात्रे, सुहास पाटील,नीलेश राणे उपस्थित होते.