रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. शेतकरी पवार यांनी सोमवार पासून पाली सुधागड तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. जिव गेला तरी मागे हटणार नाही असा इशारा शेतकरी चिंतामण पवार यांनी दिलाय.
शेतकरी चिंतामण शंकर पवार यांच्या खाजगी मालकीची जागा सर्व्हे नं.१०४ व १०६ सजा आवंढे हद्दीत असून त्यालगत सर्व्हे नं.१०५ ही मिळकत विकासक पागुर देसाई यांची आहे. कथित विकासक पागुर देसाई यांनी आपली मिळकत डेव्हलप करताना शेतकरी पवार यांच्या सर्व्हे नं १०४ व १०६ या मिळकती पैकी २२ गुंठे जागेवर अतिक्रमण करून बांधकामे केली असल्याचा आरोप उपोषणकर्ते शेतकरी चिंतामण पवार व कुटुंबीयांनी केलाय.
शेतकरी यांनी वारंवार याचा पाठपुरावा शासन दरबारी केला मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नाही. पर्यायाने २०१८ मध्ये शेतकरी पवार यांनी संविधानिक मार्गाने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले व पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अट्रॉसिटी दाखल करण्यात आली. मात्र असे असताना देखील संबंधित व्यवसाईकाने केलेली बांधकामे व कागदपत्रे नियमाला धरून नसल्याचे उपोषणकर्ते पवार यांचे म्हणणे आहे.
याबाबत महसूल विभागाकडून वारंवार तक्रारी करून कोणतीही कारवाई होत नसल्याचा संताप शेतकरी चिंतामण पवार व कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविलाय.