रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपूरातील भीम नगरात एका छोट्याशा पत्र्याच्या घरात उदय आगळेचं कुटुंब राहते… रिक्षा चालवणारे उदयचे आई वडील यांनी आयुष्यभर मेहनतीच्या पाण्यात स्वप्नांचं एक नाजूक रोप लावलं होतं… आपला मुलगा उदय शिकून मोठा होईल, कुटुंबाची दारिद्र्य रेषेखालील जीवन बदलवेल, लहान भावंडांना शिक्षण देईल, आणि घराच्या त्या जुनाट पत्र्यांना नव्या आशेची चमक मिळेल… पण, नियतीला हे स्वप्न मान्य नव्हतं.उदय, मातंग समाजाचा हा होतकरू तरुण, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी पनवेलच्या सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या वसतिगृहात फासावर लटकला… त्याच्या मृत्यूने फक्त एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाजाला हादरवलं… उदय हा कुटुंबाचा आधार होता… शाळेत चांगले गुण मिळवणारा, स्वप्नांना पंख लावणारा, आणि शिक्षणाच्या जोरावर आपल्या आई-वडिलांचं दुखणारं आयुष्य सुखकर बनवण्याची जिद्द बाळगणारा… त्याच्या नजरेत भविष्याची चमक होती, आणि त्याच्या हसण्यात कुटुंबाचा विश्वास.
पनवेलच्या सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशननं त्याला मोठमोठ्या आश्वासनांनी भुलवलं– एकही पैसा लागणार नाही, शिष्यवृत्ती मिळेल, चांगलं शिक्षण, राहणं, खाणं-पिणं सगळं उत्तम असेल.” या आश्वासनांवर विश्वास ठेवून उदय डिसेंबर 2024 मध्ये इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाला.पण, त्या भुलभुलैयातून त्याला बाहेर पडण्याचा मार्गच सापडला नाही.काही महिन्यांतच उदय बदलला.तो एकटा राहू लागला, कमी बोलू लागला, आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं…
आई-वडिलांना त्याच्या स्वभावातला बदल जाणवला,पण त्यांना कारण कळलं नाही… एकदा आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, उदयला काहीच झालं नाही, पण तो खूप टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे… शेवटी उदयने आपली व्यथा आई-वडिलांना सांगितली इन्स्टिट्यूटच्या महिला प्राचार्या, नायर, त्याला जातिवाचक शिवीगाळ करायच्या,चारचौघात अपमान करायच्या,आणि व्हिडिओ कॉल,ऑडिओ कॉल यांद्वारे त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करायच्या… हा छळ इतका टोकाचा होता की उदयच्या कोवळ्या मनाला तो सहनच झाला नाही…
2 जून 2025 च्या रात्री एक वाजता,उदयने रडत रडत आईला शेवटचा फोन केला. “आई, माझ्या बहिणी-भावाकडे लक्ष दे, त्यांची काळजी घे. मला आता जगायची इच्छाच नाही. हे प्राचार्य मला जगू देत नाहीत,असं म्हणत त्याने फोन ठेवला…दहा मिनिटांतच त्याने वसतिगृहात फास घेतला…फोन अजूनही चालू होता,आणि त्याच्या आईच्या कानात त्याचे शेवटचे शब्द घुमत राहिले.
उदयच्या वडिलांनी पनवेल पोलिसांत तक्रार दाखल केली, प्राचार्या नायर यांना जबाबदार धरलं, आणि सगळी हकिकत सांगितली.पण,पोलिसांनी कोणतीही गंभीर कारवाई केली नाही. उदयचा मोबाईल,त्याचे कॉल डिटेल्स, सीडीआर, व्हीडीआर–कशाचाही तपास झाला नाही… इन्स्टिट्यूटमध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही,आणि तरीही त्याची मान्यता कशी काय कायम आहे? असा सवाल उपस्थित होतो…
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या मते,ही संस्था यापूर्वी कर्जतमधे असताना तिथेही दोन तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या.ती प्रकरणंही दाबली गेली,आणि आता उदयच्या बाबतीतही तसंच होतंय. उदयच्या कुटुंबाचं दुखणं कोण ऐकणार?रिक्षा चालवणारे वडील यांचं आयुष्य उदयच्या स्वप्नांभोवती गुंफलं होतं. त्यांच्या पत्र्याच्या घरात आता फक्त रडण्याचा आवाज आणि उदयच्या आठवणी उरल्या आहेत.त्याच्या लहान बहिणीचं शिक्षण,भावाचं भविष्य सगळं उदयच्या खांद्यावर होतं. पण,आता त्या खांद्यांवर फक्त मृत्यूचं ओझं आहे…मातंग समाजाचा असा तरुण,जो शिष्यवृत्ती आणि आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षण घेत होता,त्याला पैशाची मागणी केली गेली, त्याचा छळ केला गेला, आणि शेवटी त्याला मरणाला कवटाळावं लागलं…
ही कहाणी फक्त उदयची नाही,तर प्रत्येक त्या दलित आणि मागासवर्गीय तरुणाची आहे… ज्यांना शिक्षणाच्या नावाखाली अपमान,छळ,आणि मृत्यू मिळतो.रोहित वेमुलापासून पायल तडवीपर्यंत आणि आता उदय आगळेपर्यंत–ही साखळी थांबायला हवी.उदय आगळे आता नाही, पण त्याच्या मृत्यूने विचारलेला प्रश्न अजूनही जिवंत आहे…दलितांना शिक्षणाचा हक्क आहे,पण न्यायाचा हक्क कधी मिळणार?