माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ माणगाव शहरातून जात असल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी हे सातत्याने दिसणारे दृश्य असते. मात्र याच परिसरातून जाणाऱ्या पुणे-दिघी राज्य महामार्गावर एक सकारात्मक आणि स्वागतार्ह चित्र पाहायला मिळते. आठवड्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असूनही, या मार्गावर विशेषतः परतीच्या प्रवासात पुणेकर पर्यटकांनी दाखवलेली वाहतूक शिस्त खरंच कौतुकास पात्र ठरत आहे. सामान्यतः पुण्याहून श्रीवर्धन तालुक्याकडे म्हणजे दिघी बंदर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर व दिवेआगरसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या वाहनचालकांवर रस्ते नियमांचे उल्लंघन व वाहतूक कोंडीचे आरोप केले जातात. मात्र अलीकडील निरीक्षणांनुसार हे चित्र परतीच्या मार्गावर पूर्णपणे बदललेले दिसते. पुण्याकडे परतणारे पर्यटक दुपारी व संध्याकाळी अत्यंत संयमित, नियम पाळणारे व अरुंद रस्त्यावरसुद्धा चुकीची ओव्हरटेकिंग टाळणारे असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
शेवटच्या सलग तीन रविवारी आमच्या प्रतिनिधीने केलेल्या निरीक्षणात, पुणे-दिघी मार्गावर, विशेषतः माणगाव शहरात, संपूर्ण मोर्बा रोड परिसरात कुठेही वाहतूक कोंडी झालेली नव्हती. ही बाब विशेष लक्षवेधी आहे, कारण या कालावधीत सागरी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. हे पर्यटक समुद्रकिनारे, मंदिरे, रिसॉर्ट्स, सीफूड आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी येतात आणि बहुतांश वेळा पुणे-दिघी या दोन लेनच्या मार्गावरून प्रवास करतात. या मार्गाचा एक टप्पा, माणगाव शहरातील गोद नदी पुलापासून मोर्बा रोड कॉर्नरपर्यंत सिंगल लेन असूनही येथे पुणेकरांनी दाखवलेला वाहन संयम विशेष उल्लेखनीय आहे. त्याउलट, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर मात्र माणगाव शहराच्या हद्दीत वारंवार वाहतूक अडथळे निर्माण होताना दिसतात. अशा परिस्थितीत पुणे-दिघी मार्गावरील शिस्तबद्ध पुणेकर हे इतर वाहनचालकांसाठी अनुकरणीय आदर्श ठरत आहेत. त्यांच्या शांत, नियमप्रिय आणि सहकार्यशील प्रवासामुळे नुसता प्रवास सुखकर होत नाही, तर नागरी शिस्तीचा आदर्श नमुना म्हणून एक वेगळी छापही निर्माण होते.