खांदाडच्या मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नागरिकांचे हाल… परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही प्रश्नचिन्ह…

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

खांदाड भागातील प्रभाग क्रमांक १५ व १६ ला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे डबके, चिखल व कचऱ्याचे साम्राज्य पाहून नागरिक हैराण झाले आहेत. एसबीआय बँकेजवळील मोर्बा रोडला लागून असलेल्या या रस्त्यावरून खांदाड गाव, माहेर मॅटर्निटी हॉस्पिटल, विविध निवासी वस्ती आणि दुकाने यामध्ये रोज शेकडो लोकांची वर्दळ असते. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून हा मार्ग नरकयातना देणारा ठरला असून रहिवासी, पादचारी व दुकानदार यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

अलीकडेच ०४ जून रोजी ड्रेनेज स्वच्छतेच्या नावाखाली काढलेला कचरा आजही रस्त्यावरच पडून आहे. त्यावरून वाहनधारक व पादचारी यांचे चालणे जीवघेणे झाले आहे. एवढेच नव्हे, काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा पाइपलाईनच्या कामासाठी खोदलेला रस्ता योग्यरीत्या भरला नसल्यामुळे चिखलाचे साम्राज्य वाढले आहे.मोर्बा रोडलगतच्या एका दुकानदाराने संताप व्यक्त करताना सांगितले, “दुकानासमोर पाणी साचल्यामुळे ग्राहक येण्यास कचरतात, त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.” यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुरुवारी दुपारी दि. 26 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आमच्या प्रतिनिधींनी पाहिले असता एक वृद्ध नागरिक रस्त्यावरून चालताना चिखलात घसरून पडण्याच्या स्थितीत आला. चालण्यास जागा नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच ०८ जून रोजी काढलेला कचरा अद्याप उचलण्यात आलेला नाही आणि त्या जागेवर गवत वाढल्यामुळे रस्ता अधिकच अरुंद व धोकादायक झाला आहे.या बिकट परिस्थितीत प्रशासनाचे दुर्लक्ष पाहता नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित नगर प्रशासनाने तत्काळ रस्त्याची स्वच्छता करून योग्य दुरुस्ती करून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी.
गुरुवारी २६ जून रात्री ८ च्या सुमारास प्रतिनिधीने पाहणी केली असता पाणी, चिखल व अस्वच्छतेमुळे हा रस्ता किती धोकादायक व कठीण झाला आहे हे पुन्हा एकदा उघड झाले. वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत असून याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.