नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
नांदगावच्या राजकारणात आज ऐतिहासिक आणि धक्का देणारी घटना घडली आहे. 1978 साली शरदचंद्र पवार यांनी इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षातून बाहेर पडून पोलाद सरकार स्थापन केलं, त्यावेळी नाशिक जिल्ह्यात ‘तराजू-काटा’ या चिन्हावरून निवडून आलेले माजी आमदार स्व. कन्हैयालाल नहार यांचं कुटुंब आता शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झालं आहे.स्व. नहार यांच्या वारसदारांनी,म्हणजेच त्यांचे पुत्र आणि नातू अमित नहार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज अधिकृत प्रवेश करत नांदगावच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडवून आणला.
प्रवेशानंतर अमित नहार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं असून आजपासून माझं संपूर्ण आयुष्य कार्यकर्ता भावनेतून शिवसेनेच्या सेवा व विकासासाठी समर्पित आहे. जनतेची ताकद आणि शिवसेनेचं बळ एकत्र करून आम्ही नव्या राजकारणाचा अध्याय लिहिणार आहोत.”
या भव्य प्रवेश सोहळ्याला सहकार महर्षी बापूसाहेब कवडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष, युवासेना प्रमुख, तसेच इतर अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. सभागृह कार्यकर्त्यांच्या जयघोषाने दणाणून गेलं. विरोधकांमध्ये प्रचंड खळबळ असून नहार कुटुंबाच्या ताकदीमुळे सत्ताधाऱ्यांची गणितं बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे…ही घडामोड फक्त प्रवेशापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण तालुक्याच्या राजकारणाची दिशा आणि भविष्यातील नेतृत्वाचं चित्रच बदलून टाकणारी आहे. आगामी काळात या प्रवेशाचे दूरगामी परिणाम निश्चितच पाहायला मिळतील.