जेएनपीए अंतर्गत आर.के.फाऊंडेशन शाळेतील कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

0
82

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

सात वर्षांचा आर्थिक छळ,मानसिक त्रास आणि प्रशासनाची उघड डोळेझाक यामुळे उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय (शेवा) येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संयम अखेर संपुष्टात आला आहे.सोमवार दि.२१ ऑगस्ट २०२५ पासून त्यांनी शाळेच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले. पहिल्याच दिवशी उन्हाच्या तडाख्याने व अधूनमधून झालेल्या पावसामुळे दोन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली. स्वप्नजा सतिश म्हात्रे आणि सौम्या राकेश पाटील या दोघींना तातडीने दवाखान्यात हलवावे लागले.या घटनेमुळे आंदोलनाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. रुस्तमजी केरावाला फाउंडेशन (विग्बोर) या नव्या संस्थेने शाळेचा कार्यभार स्वीकारून तीन वर्षे झाली असली तरी सातवा वेतन आयोग अद्याप लागू केलेला नाही. उलट सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणारी वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता जुलै २०१९ पासून थांबवण्यात आला आहे.परिणामी सात वर्षांचा पगार थकीत राहिला असून, कर्मचाऱ्यांवर प्रचंड आर्थिक बोजा पडला आहे. गेल्या सहा वर्षांत कर्मचाऱ्यांनी वारंवार निवेदनं दिली, बैठका घेतल्या; मात्र त्यांच्या मागण्या फक्त कागदोपत्रीच अडकून राहिल्या. शासन नियमांनुसार, शाळा हस्तांतरित झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत सर्व देयके चुकती होणे अपेक्षित असते, मात्र अद्यापही तो दिवस आलेला नाही.सोमवारपासून शाळा गेटसमोर हातात फलक घेऊन कर्मचाऱ्यांनी “सात वर्षांचा पगार परत द्या”,“वेतन आयोग तातडीने लागू करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला आहे.उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे, “आम्ही शिक्षणाची सेवा मनापासून दिली, पण बदल्यात आम्हाला आर्थिक अन्याय, मानसिक छळ आणि आश्वासनांवर टाळाटाळ मिळाली. आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही. आमचा हक्क मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील.” या गंभीर परिस्थितीतही शाळा प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील असंतोष अधिक वाढला असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.