बदलापूर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि पोलिसांवरच तीन गोळ्या फायर केल्या, यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली, यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला.अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर महाविकास आघाडी कडून तसेच सामान्य नागरिकांकडून एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याप्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ‘अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेने म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदेने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात?’ असे सवाल आता विचारले जात आहेत….
बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, तर दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वत:वर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर पहिल्यापासून विश्वास नाही… स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे…असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे…