महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाराष्ट्रातील रोजगार व कारखाने गुजरात येथे हलवून येथील तरुणांना बेरोजगार करण्याचे पाप या सरकारने केले असून महाडची लढाई केवळ एका आमदारासाठी नाही तर या ठिकाणच्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी आहे…म्हणूनच स्नेहल जगताप यांना विजयी करा, असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे केले.शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी सोमवारी आदित्य ठाकरे व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित जाहीर सभेमध्ये ठाकरे बोलत होते. यावेळी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, खेडचे माजी आमदार व उमेदवार संजय कदम व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.स्नेहल जगताप यांनी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाड शहरातून घोषणा देत जोरदार मिरवणूक काढण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तळपत्या उन्हात देखील अनेक मतदार या ठिकाणी उपस्थित होते.संपूर्ण शहरातून काढलेल्या या रॅलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे…यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि तटकरे यांचे निष्ठावंत बाबुशेठ खानविलकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे चंद्रकांत बुवा जाधव यांनीदेखील शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले रोजगार महाराष्ट्रात आणले जात होते. तसेच रोहा येथे बल्ग ड्रग नियोजित होता. परंतु हे सर्व गुजरात येथे हलवण्यात आल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली. यावेळी केवळ रोजगार हाच आमचा उद्देश असून याकरिता स्नेहल जगताप यांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाड औद्योगिक परिसरात सुरू होणारा दहशतवाद व दादागिरी आपल्याला संपवायची आहे. महाड नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने विकास करण्यात आला त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील विकास केला जाईल, असे स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले…