लाडक्या बहिणींना पोस्टाचा ‘सासुरवास’…केवायसी करण्यासाठी बहिणींच्या चपला झिजल्या…

0
91

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे ) :-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने राज्यातील कोट्यावधी बहिणींना सबल करण्याच्या उदात्त हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करीत दरमहा 1500 रूपये दिले…या योजनेसाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज सादर केले…मात्र,अनेक महिलांच्या बँक खात्याची केवायसी झालेली नसल्याने त्यांच्या खात्यात पैसे येवूनही आज पण अनेक महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही…सरकारी व खासगी बँकांमध्ये खात्याची केवायसी नसल्यास रांगेत उभे राहून करून घेता येते. परंतु महिलांचा सर्वाधिक छळ पोस्टाकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे…टार्गेट पूर्ण करण्याच्या उद्देशाने काही वर्षापूर्वी 100 रूपये घेत लोकांचे आयपीबीबी (IPPB) खाते उघडण्यात आले होते…यात अनेक महिलांचे खाते उघडण्यात आले व आता याच खात्यात ‘लाडकी बहिण’ योजनेचे पैसे जमा झाले आहेत…परंतु यातील अनेक खाते उपयोगात नसल्याने त्यांची ‘केवायसी’ करावी,असे सांगण्यात आले…मात्र, पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणावर छळ सुरू असल्याचे दिसून येत आहे…केवायसी करण्यासाठी 8 ते 10 किंवा 9 ते 11 असा दोन तासांचाच वेळ दिला जात असल्याने अनेकजण मागील महिन्याभरापासून पोस्टात चकरा मारत आहेत…पनवेल येथील हेड पोस्ट ऑफीसमधील कर्मचारी तर नागरिकांवर उपकार करीत आहेत,असेच वागत आहेत…दिवसभर टाईमपास केला जातो मात्र 11 वाजेनंतर आलेल्या महिला व बँक ग्राहकांना अक्षरश: हाकलून दिले जाते…हिच परिस्थिती खोपोली शिळफाटा येथील पोस्ट ऑफीसमध्ये देखील दिसून येते…केवायसी करण्यासाठी दिवसभर काऊंटर का सुरू करण्यात येत नाही? असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे…
खोपोली, खालापूर, पनवेलसह राज्यभरातील पोस्ट विभागातील कर्मचारी लाडक्या बहिणींचा अक्षरश: छळ करीत असल्याचे दिसून येत आहे…तासंतास रांगेत उभे राहूनही केवायसी केली जात नाही…महिलांना अतिशय घाणेरडी वागणूक या शासकीय कार्यालयात दिली जात आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी स्वत:ला पोस्टाचे मालक समजून महिलांना तुच्छतेची वागणूक देत असल्याचे दिसून येत आहे…भाकर नको,कुत्रा आवर…अशी म्हणण्याची वेळ अनेक लाडक्या बहिणींवर आली आहे…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, निवडणूक आयोग, पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी महिलांची होणारी ही पिळवणूक थांबविणार का? महिलांचे खाते सुरू होवून त्यांना ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळेल का? केवायसीसाठी सुरू असलेली त्रेधातिरपीट थांबणार का?असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे.