उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
रेवस रेड्डी सागरी महामार्गाचा सर्व्हे करण्यासाठी दि.५ डिसेंबर २०२४अधिकारी वर्ग दाखल झाले… यावेळी मोजणी करताना करंजा ग्रामस्थांनी अधिकारी वर्गाला महामार्गाला विरोध न करता येथील पूर्वापार प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी पर्वत व जागृत द्रोणागिरी देवीच्या मंदिराला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता सर्व्हे करण्याची मागणी लावून धरली होती… अखेर कोणताही ठोस असा सर्व्हे न करता अधिकारी वर्ग परतले आहेत… ऐतिहासिक समजले जाणारे द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिराच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असे करंजा ग्रामस्थांनी सांगितले… तसेच ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वत व मंदिराला धक्का लावला तर पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी…
माजी मुख्यमंत्री बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८० मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती… मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील करंजा – रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमीपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते… या रेवस ते रेडी या सागरी महामार्गाची एकूण लांबी ४९८ किमी इतकी आहे… पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग असणार आहे.मात्र सदर महामार्ग हा उरण तालुक्यातील मौजे चाणजे या परिसरातून जात असताना ही याठिकाणावरील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांना विश्वासात न घेता भू संपादन, जागेचा सर्व्हे करण्यास शासनस्तरावर प्रयत्न केले जात असून त्याची माहिती स्थानिक शेतकरी, करंजा ग्रामस्थ मंडळ, जमीनधारक, सामाजिक कार्यकर्ते, कोंढरी ग्रामस्थ मंडळाला देण्यात आली नसल्याने संबंधितांनी आम्हाला विश्वासात घेऊन सदर प्रकल्प मार्गी लाण्याची मागणी शासनाकडे केली होती… त्या संदर्भात नुकतीच प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत अधिकारी वर्ग व करंजा ग्रामस्थ यांची बैठक संपन्न झाली होती… त्यावेळी प्रांत अधिकारी पवन चांडक यांनी घटनास्थळी जाऊन मोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मोजणी करण्यासाठी एमएसआरडीसीचे अधिकारी अनिरुद्ध बोराडे, करंजा ग्रामस्थ कल्पेश थळी, मेघनाथ थळी, मधुकर थळी, सचिन डाऊर, हरेशवर थळी, संतोष डाऊर, परेश थळी आदींच्या उपस्थितीत सर्व्हे सुरू होता… त्यावेळी ग्रामस्थांच्या निदर्शनास या सागरी महामार्गामुळे ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वत व जागृत द्रोणागिरी मंदिराला धोका निर्माण होऊन अस्तित्व संपुष्टात येईल… यामुळे ग्रामस्थांनी याला विरोध करीत मंदिर व पर्वताला धोका न पोहचता बाजूने महामार्गाचा सर्व्हे करण्याची मागणी लावून धरली…
रेवस रेड्डी सागरी महामार्गाला विरोध नसून उरण तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावता बाजून रस्ता करण्यात यावा… या भागात माती नसल्याने काही ठेकेदार व भूमाफियांनी अधिकारी वर्गाना हाताशी धरून पर्वताची माती मिळविण्यासाठी राज्यकर्त्यांना हाताशी धरून हा घाट घातला असल्याचे समजते यामुळे उरणवासियात संतापाची लाट पसरली आहे… द्रोणागिरी पर्वत व मंदिराला धक्का लावून पोखरण्याचा प्रयत्न केला तर समस्त उरणवासी व पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरतील, त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा करंजा ग्रामस्थांनी दिला आहे… याबाबत शासन काय निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे…