गृहमंत्री अमित शाहांनी देशवासीयांची माफी मागावी…देशभरात अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध…

0
44

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले आहे त्याचा व परभणीतील दडपशाही, सोमनाथ सुर्यवंशी कस्टडी मृत्यू याचा सर्व संविधानप्रेमी, समतावादी, पुरोगामी संघटनांकडून देशभरात निषेध होत आहे. पाली सुधागड येथे सुधागड तालुका बौद्धजन पंचायत रजिस्टर क्रमांक 27 56 या संस्थेच्या वतीने पाली तहसीलदार व पाली पोलीस स्टेशन मध्ये निषेधाचे निवेदन देऊन जाहीर निषेध दर्शविला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करुन गृहमंत्री अमित शाह हे संविधानिक विधानिक मूल्यांच्या विचारांच्या विरोधातील अवैज्ञानिक, मनुवादी विचारांचाच पुरस्कार छुप्या पद्धतीने करीत आहेत. ते ज्या संविधानाची शपथ घेऊन गृहमंत्री झाले त्या मूल्यांच्या विसंगत वर्तन करीत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गणराज्य भारत देशाला दिलेल्या संविधानाची याच देशातच विटंबना, मोडतोड आणि जाळपोळ होते ही खरे तर या अखिल भारत देशाची अधोगतीच म्हणावी लागेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हे तर सामाजिक न्याय, समता आणि मानवाधिकारांचे प्रणेते आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा योगदानाबद्दल आक्षेपार्ह बोलणे हा फक्त त्यांच्या कार्याचा अपमान नाही, तर समताधिष्ठित समाजाच्या मूल्यांवर प्रहार आहे. भारत सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच संसदेमध्ये संविधान चर्चेदरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजी असून संतापाची भावना आहे. संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहेत. अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच भारतीय संसदेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अपमाकारक वक्तव्य केले. त्याच्या संदर्भात अमित शहा याने पूर्ण देशवासीयांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली..