तळीये दरडग्रस्त दलित कुटुंब अजूनही घरापासून वंचित… दलित समाजाचे असल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे का?

0
47

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

22 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. जिल्ह्यातील महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तर तळीये येथे दरड कोसळून 84 जणांना आपला प्राण देखील गमवावा लागला होता. शासनाने सर्व जबाबदारी हाती घेत दरडग्रस्तांना आर्थिक मदत व पुनर्वसन म्हणून घरांची पूर्तता केली. परंतु अद्यापही काही कुटुंबांना शासनाकडून घर मिळाले नाहीत. उलट ज्यांना राहण्यासाठी घरांची गरज नाही त्यांना शासनाने घर दिली व खरंच ज्यांना घरांची गरज आहे त्यांना मात्र घरापासून वंचित ठेवण्यात आले आहे… तळीये दरडीमध्ये अनिल गंगावणे यांना आपला एक पाय देखील गमवावा लागला आहे…असे असतानाच शासनाने त्यांना राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था केली होती परंतु त्या कंटेनरला मोठमोठाले भगदाड पडले असून साप, उंदीर, घुशी, किडे वारंवार घरात येत असल्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाकडे सतत मागणी करून देखील शासन आम्हाला घर देत नसून आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गंगावणे कुटुंबीयांनी केला आहे… लवकरात लवकर शासनाने आम्हाला घर दिलं नाही तर आम्ही सर्व कुटुंब याच राहत्या कंटेनरमध्ये आत्महत्या करणार असल्याचे गंगावणे कुटुंबीयांनी सांगितले आहे.