पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्याच्या घोषणेला हरताळ…दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार की काय ?…

0
40

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

महाराष्ट्र शासनाच्या नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्री यांना खाते वाटप झाल्यानंतर दोन दिवसांत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महीला व बालविकास मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री तथा शिंदे गटाचे भरत गोगावले, यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणेला जवळपास पंधरा दिवस झाले तरी अजूनपर्यंत रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही.प्रचंड प्रमाणात बहुमत मिळूनही महायुतीच्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री सहित मंत्रिमंडळाचा शपथविधी हा तात्काळ होवू शकला नाही. निकालानंतर तब्बल सतरा दिवसानंतर म्हणजे १०डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर आठ दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार नागपूर येथे करण्यात आला.१६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झाले. संपूर्ण अधिवेशन पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झालेले नव्हते. खातेवाटप जाहीर होताच नाराजी वाढेल आणि अधिवेशन काळात महायुती मध्ये अडचणी वाढतील या दबावाखाली राहत खातेवाटप लांबविण्यात आले. म्हणजेच प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीतील घटकपक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्टपणे दिसत आहे.अधिवेशन संपताच मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. त्यावेळी दोन दिवसांत पालकमंत्र्यांच्या नियुक्त्य होतील असे सरकारच्यावतीने सांगण्या आले होते. मात्र आता दहा दिवस उलटूनही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या ह्या रखडलेल्या आहेत. ज्या जिल्ह्यात एका पेक्षा अधिक मंत्रीपदे आहेत त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामधे रायगड जिल्ह्याचा देखील समावेश आहे.रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, यांना पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्यातील अनुभव पाहता पालकमंत्री पद मिळावे तर शिंदे गटाचे, जिल्ह्यात तीन आमदार एक मंत्री आहे. म्हणून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.या दोघांच्या भांडणात दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्री हा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त होवू शकतो अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि श्रीवर्धनच्या आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवानेत्या आदिती तटकरे हे दोन मंत्री पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये छुपा संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच मागील सरकारमध्येसुध्दा, राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याऐवजी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हयाचे आमदार उदय सामंत, यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगडचाच आमदार पालकमंत्री असेल असे सांगितले जात आहे. ना. भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असले तरी ना. तटकरे देखील तितक्याच आग्रही आहेत…