आदिवासी वाडीतील उत्खनन स्थानिक बांधवांच्या मुळावर… गावावर दरड कोसळण्याचा मोठा धोका…

0
36

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):- 

रायगड जिल्ह्यात नव्याने मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे व फार्महाऊस थाटत आहेत… अशातच स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, आदिवासी बांधवांचे विकासक आणि भांडवलदार यांच्याकडून शोषण होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे… स्थानिक शोषित वर्ग प्रशासनापुढे न्याय मिळावा यासाठी टाहो फोडतो आहे, मात्र डोळ्यावर घट्ट पट्टी बांधली गेल्याने प्रशासनाची भूमिका आंधळी, बहिरी व मुकी अशीच दिसून येत आहे…

खालापूर तालुक्यामधील ग्रामपंचायत आतकर गाव अंतर्गत आडोशी गावातील काही व्यक्तींनी फार्महाऊस उभारण्यासाठी बेसुमार उत्खनन केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत… ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार भुसख्खलन होऊन दरडी कोसळून तालुक्यात आडोशी आदिवासी लोकवस्तीत  इर्शालवाडी सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे… प्रशासन व सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आदिवासी बांधवांच्या वित्त जीवित रक्षणार्ध व न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवत आमरण उपोषण सुरू केले आहे… वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेरावसह आदिवासी बांधवांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे… जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक उग्र होईल असा इशारा देण्यात आला आहे…