रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी प्रचंड असा पाठिंबा दिला आणि स्पष्ट बहुमत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारला मिळाले. सत्तास्थापन झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे आपल्या हातात घेतली. मुख्यमंत्रिपद मिळाले नसल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा ही सातत्याने रंगताना दिसली. सुरूवातीला मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच बघायला मिळाली. आता सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झालेले असताना अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटलेला नाहीये.आता रायगडच्या जिल्हा आणि नियोजनाची बैठक पार पडली… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगडची जिल्हा आणि नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीला रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. पण शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले या बैठकीत नव्हते. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी आपल्याला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आले नसल्याचे स्पष्ट सांगितले… या बैठकीला फक्त मंत्र्यांनाच आमंत्रण असल्याचे सांगितले गेले. आता या बैठकीला आपण का उपस्थित नव्हतो हे सांगताना स्वत: मंत्री भरत गोगावले हे दिसले आहेत. भरत गोगावले म्हणाले की, अजित दादांनी बोलावलेल्या बैठकीला आज आम्हा मंत्र्यांनाच निमंत्रित होते. आमच्या इतर चारही आमदारांना बोलावले नव्हते. फक्त दोन मंत्र्यांनाच बोलावले होते. परंतू मी रायगडावर असल्याने मी जाऊ शकत नव्हतो. कारण भिडे गुरूजींचा धारकऱ्यांचा कार्यक्रम होता.त्यांचा जो काही दाैरा होता, पाच दिवसांचा पायी चालत ते पाच दिवस चालतायत आणि आज त्यांचा सांगता समारोप होता. तो आम्ही रायगडावर केला. आमच्यासोबत जवळ जवळ पाच आमदार देखील आले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम तिथे केला. परंतू मी या बैठकीला पोहोचू शकत नव्हतो. ती साडेनऊची बैठक होती आणि त्यानंतर मी कॅबिनेटलाही पोहोचू शकत नव्हतो. त्याच्यामुळे या बैठकीला हजर राहू शकलो नाही, असे म्हणताना भरत गोगावले दिसले.