कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला… मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर सातजण जखमी… 

0
27

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

ट्रेकिंगसाठी पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर गेलेल्या एका पर्यटकाचा मधमाशांच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी पळताना पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याजवळ घडल्यामुळे प्रकारामुळे पर्यटकांना हल्ल्यातून बचावासाठी फारशी हालचाल करता आला नाही. यात सात जण जखमी झाले आहेत.कर्नाळा पक्षी अभयारण्यात सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते. अनेक ट्रेकर्सही किल्ल्यावर चढण्यासाठी येत असतात. शनिवारी सकाळी ११ वाजता ट्रेकिंग करीत कर्नाळा किल्ल्यावर पोहोचलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी पर्यटकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु डोंगराचा तीव्र उतार, किल्ल्याच्या पायऱ्या यामुळे त्यांची मोठी अडचण झाली…यामध्ये सातजण मधमाशांच्या डंखाने आणि पळताना पडून जखमी झाले.कोपरखैरणे येथील रहिवासी असलेले ४० वर्षीय संदीप पुरोहितही पळताना पडले. बेशुद्ध अवस्थेत अनेक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. किल्ला चढून मदत मिळण्यासाठी उशीर झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.मुंबईतील व्हीजेटीआय इंजिनीअरिंग कॉलेजच्या मुलांसह इतर पर्यटकांचा यात सहभाग आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते यांनी दिली. रुद्रप्रताप साहू (२०, रा. सीवूड्‌स), चिराग पाटील (१९, रा. माटुंगा), अनिश साळवी (१९, रा. बोरिवली), ऋषिकेश नवघरे (२०, रा. गोवंडी), इलमुर्गन शंकरन (५५, रा. खांदा कॉलनी), वंश वाघ (१९, रा. शीव), वंश दजाई (१९, रा. शीव) अशी जखमींची नावे आहेत…