नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा दिनांक १८ फेब्रुवारी २०२५, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, सायंकाळी ७.३० वाजता. पाषाणे, कर्जत येथे मोठ्या उत्साहात आणि शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला…या सोहळ्यास रोजगार हमी मंत्री मा.नामदार भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे प्रमुख उपस्थित होते…यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना भरतशेठ गोगावले म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत पुसले जाऊ शकत नाही. त्यांनी उभारलेले स्वराज्य आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास अजरामर आहे. आज आपण सर्व जण त्यांच्या स्मारकासमोर उभे आहोत, ही मोठी गौरवाची बाब आहे. पाषाण गावाने हे भव्य स्मारक उभारून शिवप्रेमाचा अभूतपूर्व आदर्श निर्माण केला आहे. याला मी मनःपूर्वक वंदन करतो.”
शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी पुढे सांगितले,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी अपूर्व कार्य केले आहे…त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे जावे. कोकणासाठी सर्वाधिक निधी देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेबांनी केले आहे. त्यामुळे कोकणाच्या विकासाला गती मिळाली आहे…जन्म झाल्यावर जशी पंढरीची वारी करावी, तसे प्रत्येकाने एकदा तरी रायगड पाहायला हवा…रायगड पाहिल्याशिवाय शिवरायांचे कार्य पूर्णपणे समजणार नाही…
कार्यक्रमात बोलताना पाषाण गावातील भवानी माता मंदिर, छत्रपती शिव शंभू मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही आपल्या ऐतिहासिक वारसा याची साक्ष देतात. ही ठिकाणे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील आणि याची इतिहासात नोंद घेतली जाईल. शिवचरित्र वाचल्याशिवाय यशाचा मार्ग सापडणार नाही. आजच्या तरुणांनी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी योगदान दिले पाहिजे.”
जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर राहील, आणि हे स्मारक त्याची साक्ष देत राहील…छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सन्मान आणि आपला अभिमान…यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करत सांगितले…माझा शिवसेनेचा कार्यकर्ता श्री. राहुल विशे यांनी आतापर्यंत सभापती म्हणून जबाबदारी निभावली आहे. पुढील काळात त्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून देण्याचे आवाहन मी सर्वांना करतो.
या ऐतिहासिक सोहळ्यात एकनाथजी शेलार (शिवसेना सहसचिव), दीपक कथोरे, शिवराम बदे (विधानसभा संघटक),उत्तम शेळके (खजिनदार),भरत डोंगरे (उपतालुका प्रमुख), प्रशांत झांजे (उपतालुका संपर्क प्रमुख), भरत हाबळे (विभाग प्रमुख),रामचंद बदे, भानुदास राणे (विभाग प्रमुख),दशरथ ऐनकर (विभाग प्रमुख), रवी फोपे, संतोष भुंडेरे (संघटक),गणेश शेळके तसेच पाषाणे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते…याप्रसंगी सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांना मानाचा मुजरा अर्पण केला.