रत्नागिरी शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
आयुष्यमान भारत प्रधानमन्त्री आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ई-कार्ड्स बनवली जात आहेत… या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना यांचा लाभ मिळणार आहे… पाच लाखांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून गोल्डन कार्ड्स दिली जाणार आहेत… याद्वारे ५ लाखांपर्यंत मोफत रुग्णसेवा कशी मिळणार त्याची थोडक्यात माहिती अशी आहे की, गंभीर अशा १,३५६ आजारांवर प्रति कुटुंब मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत… या योजनेअंतर्गत नियोजित ३४ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलांमध्ये कॅन्सर, ह्रदयविकार शस्त्रक्रिया, मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, बालरोग, स्त्रीरोग, मोतीबिंदू आजार वगळता नेत्र-शस्त्रक्रिया, सांधेरोपण आदी आजारांवर या “गोल्डनकार्ड” प्रणित योजनेअंतर्गत “आधार” मिळणार आहे…
गोल्डन कार्ड बनविण्यासाठी जिल्हा निहाय मोहीम राबविण्यात येत आहे…. यामध्ये कोंकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम ५१ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३१ टक्के कामं झालेली आहेत… सर्व नागरिकांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्ती किरण पुजार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे…
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ४ लाख २६ हजार कुटुंबांतील १६ लाख ५८ हजार लाभार्थी निश्चित झाले असून, आतापर्यंत ५ लाख ३९ हजार लाभार्थींना हे गोल्डन कार्ड्स मिळाली आहेत, ही टक्केवारी ३३ टक्के इतकी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ लाख २३ हजार कुटुंबांतील ८ लाख ३४ हजार लाभार्थींना ही योजना निश्चित झाली असून, त्यातील ४ लाख १६ हजार लाभार्थींना म्हणजे ५१ टक्के गोल्डन कार्ड वितरित झाले आहेत…