माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
माणगाव येथील खांदाड परिसरातील लोकवस्ती आणि वर्दळ असलेल्या ठिकाणी एका तलावामध्ये मगरींचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आल्या नंतर ड्रोन कॅमेराद्वारे सोमवार दि. १० मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास रेस्क्यू टीम कडून शोध मोहीम सुरु करण्यात आली…. या बाबतीत पाठपुरावा केला असता, मागच्या दीड-दोन वर्षांपासून येथे मगरिंचे वास्तव्य असल्याची बाब समोर आली आहे… गेल्या वर्षी खांदाड भागात अनेक मगरीचे पिल्लू तलावात पाहायला मिळाले होते, तसेच आता त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली व तालावाच्या काठावर त्यांचा सूळ सुळाट अधून मधून दिसत होता… तर काही महिन्यांपूर्वी वस्तीतील एका तरुण युवकाला एका निवासस्थानी मगर दिसली असता, त्या तरुणाने मगरीला जवळच असलेल्या काळ नदीमध्ये सोडले होते… ही बाब ताजी असतानाच उन्हामुळे तलावाचे पाणी आटत असल्याने तलावात असलेल्या मगरी या तलावाच्या काठावर येऊ लागल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे….
मगरिंच्या सुळसुळाटाची बातमी मीडियामध्ये प्रसिद्ध होताच वन खात्याने बातमीची दखल घेऊन तलावाचा सर्व्हे केला होता… मात्र तलाव मोठा असल्याने तसेच वर्दळ ठिकाणी असल्याने रेस्क्यू टीमची मदत घेण्याचे ठरले आणि काही तासात कोलाड येथील रेस्क्यू टीम हजर होऊन पहाणी केली असता त्यांनाही ते कठीण वाटल्याने अखेर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पाहणीचा निर्णय होऊन अखेर सोमवार दि. १० मार्च रोजी रात्री ११:३० च्या सुमारास रेस्क्यू टीम येऊन सुमारे एक तास ड्रोन कॅमेऱ्याच्या सहायाने किती मगरी व त्यांची किती पिल्ले आहेत तसेच तलावाच्या कोणत्या दिशेने आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी ड्रोन ची मदत घेण्यात आली…. मात्र संपूर्ण तलावात पाणी भरपूर असल्याने व त्यावर शेवाळ असल्याने व चिखलाचा रंग आणि मगरिंचा शरीराचा रंगात साम्य असल्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या पंख्याच्या आवाजामुळे ड्रोन कॅमेऱ्याला सुपर फ्लॅश प्रकाश जोडून तलावात प्रकाश सोडल्याने सर्व मगरी मिळेल त्या झुडपात, दलदलीत लपून राहिल्याने ऑपरेट स्क्रीन रेंजमध्ये मगरींचे चित्र मुळीच दिसत नव्हते…. अखेर ती मोहीम थांबवून दुसरा उपाय शोधून मगर या तलावातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला…. दरम्यान वनक्षेत्र अधिकारी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी. एस. सुभेदार यांनी रेस्क्यू टीम बरोबर चर्चा विनिमय करुन लवकरात लवकर हे तलाव मगरमुक्त करून मगरींना नदीत न सोडता समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला…