हवामानातील बदलांचा कोकणातील हापूस उत्पादनावर परिणाम… अपेक्षित थंडी न पडल्याने पहिल्या बहरातील मोहोर गळून पडला…

0
26

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

हवामानातील बदलांचा कोकणातील हापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. अपेक्षित थंडी न पडल्याने पहिल्या बहरातील मोहोर गळून पडल्याने हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गंवा तीस ते चाळीस टक्के उत्पादनाची अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत. परिणामी पाडव्याच्या तोंडावर दरात दुपटीने वाढ झाली. पुणे बाजारपेठेत हापूसच्या डझनाचा भाव १५०० ते दोन हजार इतका आहे. कोकणात बंद पावसाचा मुक्काम लांबल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली, नंतरही हवामानातील चढ-उतार सुरूच होते. उष्णता वाढल्याने फळगळती झाली. काही ठिकाणी कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला…त्यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. दरवर्षी तीन टप्यांत आंबा बाजारात दाखल होतो. पहिल्या टप्प्यात कमी आंबा बाजारात दाखल होतो. त्यामुळे या टप्प्यातील आंब्याचे दर चढे राहतात, दुसऱ्या टप्प्यात आंब्याची आवक वाढते, त्यामुळे आंब्याचे दर कमी होण्यास सुरुवात होते. तर तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक आंबा बाजारात येतो, त्यामुळे हा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतो, मात्र यंदा पहिल्या टप्प्यातील आंबा एक महिना उशिरा दाखल झाला.