उरण शिवसत्ता टाइम्स ( प्रवीण पाटील ) :-
उरण ओएनजीसी परिसरात मंगळवार दिनांक १८ मार्च रोजी सकाळी भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला…स्फोटाचा आवाज एवढा तीव्र होता की,कंपनीच्या बाहेरील घरेही थरथर कापली…घाबरलेले नागरिक व घाबरलेले कामगार यांनी त्वरित घराबाहेर व कंपनी बाहेर धाव घेतली. मात्र या घडलेल्या गंभीर घटनेबाबत ओएनजीसी प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की बाहेरच्या घरांना हादरे बसले तसेच आतमध्ये असलेल्या कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले…कंपनीमध्ये कॉम्प्रेसर दुरुस्तीचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती कामगारांनी दिली.घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आली व सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही…याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती न दिल्याने घडलेल्या घटनेविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. घटनेनंतर नागरिकांनी ग्रामपंचायत व राजकीय नेत्यांच्या अनुपस्थितीवर रोष व्यक्त केला. ” ओएनजीसी प्रशासनाशी असलेल्या संबंधांमुळे स्थानिक पदाधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात” असा आरोप संतप्त नागरिकांनी केला. यापूर्वी अशा दुर्घटनांमध्ये कामगारांचे बळी गेले आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.सदर आगीत कंपनीचे नुकसान झाले असून कोणत्या प्रकाराची मनुष्यहानी झालेली नाही.
दररोज लहानमोठ्या घटना घडत असतात, पण प्रशासन व राजकीय नेते यावर काहीच कारवाई करत नाहीत. आम्हाला जीव मुठीत धरून इथे राहावं लागतंय,” अशी नागरिकांची भावना आहे. ओएनजीसी प्रशासन व स्थानिक प्रशासनाने पारदर्शकता ठेवत ठोस पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उरणकरांना पडला आहे.