नागोठणे प्रकल्पाविरोधात बेमुदत आमरण उपोषण यशस्वी… आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा…

0
25

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

                   रिलायन्स नागोठणे संलग्न नवीन प्रकल्पाविरोधात बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली होती… आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील शेतकरी, मत्स्य व्यवसायिक, स्थानिक भूमिपुत्र, यांनी आमरण उपोषण सुरू केले होते…अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे पदाधिकारी, सभासद , शेतकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणस्थळी जाऊन लेखी आश्वासन दिल्याने बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील स्थानिक , भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार, पशुपालक आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची दखल रिलायन्सने घ्यावी यासाठी आमरण उपोषणाचा पर्याय अवलंबिण्यात आला होता. विशेष म्हणजे लढाऊ भूमिकेने आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनी कडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी तसेच इतर महत्वपूर्ण आठ मागण्या घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने उभारलेल्या लढ्याला यश आल्याचे दिसून आले. बेणसे सिध्दार्थ नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ आमरण उपोषणास बसलेल्या बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ.स्मिता यशवंत कुथे, सौ.कल्पना बबन अडसुळे, योगेश मंगेश अडसुळे, सचिन कुथे या चार उपोषणकर्त्याना विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांनी जोरदार पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले. दरम्यान पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत स्थानिकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने लवकरात लवकर रिलायन्स व्यवस्थापनाने मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मकतेने कृती करावी अशी मागणी उपोषणकर्ते, बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे,अन्य पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली…