मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
सातत्याने मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवाशी व त्याचबरोबर वाढती मालवाहतूक लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महत्वाकांक्षी असा मुंबई ते नाशिक पर्यंत लोकल चालविण्याचा संकल्प हाती घेऊन याकामी गतीशील कार्यतत्परता दाखवली आहे. मुंबई-नाशिक प्रवासासाठी “पंचवटी एक्सप्रेस” सारख्या काही गाड्या आहेत, मात्र मुंबई लोकल पुढे नाशिक पर्यंत नेल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल आणि खासगी वाहनांना लागणाऱ्या इंधनाची बचत होईल. मुख्यत्वे नाशिक व मुंबई ही दोन शहरे यामुळे जवळ येतील, जोडली जातील असे तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी लक्षवेधी निवेदन दिले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे माजी खासदार हेमंत गोडसे यांचे प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहेत.
नाशिक पर्यंत लोकल नेण्यासाठी कसारा घाटाची संभाव्य अडचड समोर होती, आता ही अडचण दूर होणार असल्याने मुंबई ते नाशिक लोकल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनमाड ते कसारा या नवीन मार्गाला अंतीम मंजुरी मिळाल्याने हा प्रश्न धसास लागणार आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्याने रेल्वे वाहतूकीला गती मिळणार आहे. नव्या लाईनसाठी बोगद्याच्या डायमीटर वाढवला जाणार आहे त्यामुळे वेगाने प्रवास होण्यास मदत होईल. दरम्यान या मार्गावर न्यू नाशिक रोड, न्यू पाडळी, वैतरणानगर आणि चिखलखैरे या नवीन चार स्थानकांची वृद्धी होणार आहे.