ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग… कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप…

0
35

 रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

शहरातील औद्योगिक वसाहतीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुमारे 900 मीटर लांबीच्या गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली…या आगीत आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसली,तरी गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावरील साहित्याची हानी झाली आहे. सध्या घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांसह दीपक नायट्रेट कंपनीची अग्निशमन गाडी आग विझवण्यासाठी प्रयत्नशील आहे…आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे…

या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी सुरुवातीच्या माहितीनुसार, गोडाऊनमधील इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवलेले साहित्य, कोणतीही आगीविरोधी यंत्रणा कार्यान्वित नसणे, कर्मचारी वर्गास योग्य प्रशिक्षणाचा अभाव आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राथमिक उपाययोजनांचाही अभाव या सगळ्या बाबी गंभीर स्वरूप धारण करतात…

ट्रान्सपोर्ट कंपनीच्या प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी न घेता फक्त व्यावसायिक फायद्यावर भर देण्यात आल्याचे दिसून येते. इतक्या मोठ्या गोडाऊनमध्ये फायर अलार्म, स्प्रिंकलर, हायड्रंट सिस्टम यांचा अभाव म्हणजे थेट कर्मचाऱ्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे…गेल्या काही वर्षांत या औद्योगिक पट्ट्यात घडलेल्या घटनांनंतरही कंपनी प्रशासनाने कुठलाही धडा न घेणे म्हणजे हे अक्षम्य दुर्लक्ष ठरते…

या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आगीमुळे हवेत धुराचे मोठे लोट पसरले असून, त्यामुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तातडीने घटनास्थळी भेट देण्याचे किंवा तपास सुरू करण्याचे कोणतेही लक्षण अद्याप दिसून आलेले नाही. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण आणि आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या मंडळाचे हे मौन जनतेच्या आरोग्याशी होणाऱ्या खेळाकडे दुर्लक्ष करणारे आहे.

या घटनेने औद्योगिक कंपन्यांच्या निष्काळजी कारभारासह त्यांना संरक्षण देणाऱ्या शासकीय यंत्रणांचा बुरखा फाडला असून, प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या बाबीकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक ठरणार आहे.