मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
मुंबईतील घरच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल-२०२५ च्या रणधुमाळीत अखेर सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत मुंबई इंडियन्सने नोंदवला मोसमातील आपला तिसरा विजय आणि चाहत्यांची मने जिंकली. मात्र अपेक्षावत चौकार-षटकारांची आतषबाजी फारशी झाली नाही. सीमापार आणि हेलीकॉप्टर शॉट्सची खैरात, मौज उपभोगता आली नाही, कारण येथील खेळपट्टीने अनपेक्षित आपला मूड बदलल्याने चाहत्यांच्या आनंदाला थोडी मुरड बसली, चेंडू थांबून बॅटवर येत होता, फलंदाजाला मनमुराद फटकेबाजी करणे अवघड जात होते. तरीपण, अखेर मुंबई इंडियन्सचा विजय त्यांच्या हर्ष-उल्हासाचा पुढाकार घेत साक्षिदार बनला.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आज मुंबई इंडियन्सचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराची संघातील उपस्थिती संघाला उर्जा देणारी होती. हैदराबादच्या सलामी जोडीला पहिल्या षटकात दोन वेळा जीवनदान मिळाले. पण त्यानंतर त्यांना मोठे फटके मारण्याची संधीही दिली गेली नाही. हार्दिक पंड्या गोलंदाजीस आला आणि त्याने सलामीजोडी फोडली, अभिषेक शर्मा ४० धावा काढून माघारी फिरला. पुढे हैदराबादी निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ पर्यंतच मजल मारू शकले.
मुंबई इंडियन्सच्या वतीने १६२ धावांचा पाठलाग करताना विल जॅक्सने ३ चौकार आणि २ षटकार ठोकत सर्वाधिक ३६ धावा केल्या. हार्दिक पंड्याने ९ चेंडूत २१ धावा तर तिलक वर्माने १७ चेंडूत २१ धावा करीत शेवटी चौकार लगावत विजयश्री खेचून आणली. याआधी आज रोहित शर्माने १६ चेंडूत ३ षटकार ठोकत सनसनाटी सुरुवात करून दिली होती.
या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विल जॅक्सने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमरा व हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक एक विकेट काढली. आजचा सर्वात मोठा किस्सा म्हणजे “फूलटॉस” चेंडूचा मारा भेदक ठरला. सर्वच फलंदाज “फूलटॉस” चेंडूवर बाद होतांना दिसत होते आणि हा सगळा “मूडी” खेळपट्टीचा रंग होता.