मोदींच्या राजवटीत जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा अ‍ॅटॅक… जम्मू काश्मीर हादरले…पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला… 

0
14

श्रीनगर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पर्यटकांचे विशेष आवडते असलेले जम्मू-काश्मीरमधील पहलगाम शहर मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने हादरून गेले… पहलगामच्या बैसरन खोऱ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घेत फिरणाऱ्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात २२ भारतीय पर्यटक, दोन विदेशी आणि दोन स्थानिक नागरिक असे २६ जण ठार झाल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. या भ्याड हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सन २०१९मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा हा काश्मीर खोऱ्यातील सर्वांत घातक हल्ला असल्याचे म्हटले जात आहे…

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर असताना आणि ऐन पर्यटनाच्या हंगामात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. रिसॉर्टचे शहर असलेल्या पहलगामपासून सुमारे सहा किमी अंतरावर असलेले बैसरन हे एक विस्तृत गवताळ पठार असून घनदाट पाइनची जंगले आणि पर्वतांनी वेढलेले आहे. ‘मिनी स्वित्झर्लंड’ अशी ओळख असलेले हे ठिकाण देशभरातील तसेच जगभरातील पर्यटकांचे आवडते आहे.दुपारी ३वाजण्याच्या सुमारास काही सशस्त्र दहशतवादी या ठिकाणी आले आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणाऱ्या, खेचरांवरून प्रवास करणाऱ्या, तसेच निवांत बसून निसर्गाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार सुरू केला, असे अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अस्थिर काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला होण्याची ही दुर्मिळ घटना असून, या हल्ल्यात किमान २० जण जखमी झाले. पर्यटकांवरील हल्ल्याचे वृत्त देशभर

वाऱ्यासारखे पसरले आणि ज्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, परिचित पहलगामला पर्यटनासाठी गेले होते, त्यांच्या काळजात धस्स झाले.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत. पनवेलमधील एक तर पुण्यातील दोन जणांचा मृतांच्या यादीत समावेश आहे.

पनवेलच्या दिलीप देसले (वय 60) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले सुबोध पाटील (वय 42) हे जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जगदाळे यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यावेळी एक नागपूरचे कुटुंब सुद्धा तिथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हेसुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात येत आहे.सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा मृतांमध्ये समावेश आहे. राज्यातील मृतांचे पार्थिव शरीर मुंबई आणि पुण्यात विमानाने आणले जाणार आहे. चार जणांचे पार्थिव शरीर मुंबईत येणार आहे तर दोन जणांचे पार्थिव शरीर पुण्यात आणले जाईल. या व्यतिरिक्त हल्ल्यात सुमित परमार, यतिश परमार या दोन जणांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव शरीर मुंबईत आणले जाणार आहे…