मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
IPL-2025 च्या मोसमातील काल ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्या मध्ये रंगला आणि अत्यंत लक्षणीय ठरला तो राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय वैभव सुर्यवंशी या युवा खेळाडूच्या तडाखेबाज फलंदाजीने.जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर डोळ्यांचे पारणे फेडणारी फलंदाजी करीत त्याने अवघ्या ३५ चेंडूत सर्वाधिक जलदगतीने शतक नोंदवून एक भारतीय खेळाडूचा नवीन किर्तीमान स्थापित केला आणि आपल्या संघाला तब्बल ८ विकेट्सने बहारदार विजय मिळवून दिला.
गुजरात टायटन्स संघाच्या २१० धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल सोबत सलामीला मैदानात उतरताना वैभव सुर्यवंशी यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला तेव्हाच आपले इरादे स्पष्ट करीत ऐतिहासिक शतक ठोकले. यशस्वी जैस्वाल व वैभव सुर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची सलामी भागिदारी रचली. वैभवने ३८ चेंडूत ११ षटकार आणि ७ चौकारांसह १०१ धावा केल्या. त्यानंतर आलेला नितीश राणा ४ धावांवर माघारी फिरला मग कर्णधार रियान पराग व यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला विजया पर्यंत पोहोचवले. यशस्वी जैस्वाल याने ७० धावांची तर रियानने ३२ धावांची नाबाद खेळी केली.
प्रेझेंटर मुरली कार्तिक यांनी राजस्थानच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशन दरम्यान वैभव सुर्यवंशी याला विचारले की इतक्या दिग्गज अनुभवी गोलंदाजांसमोर खेळताना तुला कसलं दडपण होते का ? तेव्हा वैभव उत्तरला की..मी फक्त बॉल पहात होतो आणि खेळत होतो, IPL मधील माझी ही तिसरी इनिंग व पहिलेच शतक…मी स्पर्धेपूर्वी खूपच सराव करतो आणि ही त्याचीच परिणती पण त्याहून समोरून मला वेळोवेळी यशस्वी जैस्वाल मार्गदर्शन करीत होता आणि मला त्यांच्यासोबत बॅटींग करायला नेहमी आवडतं असं म्हणत त्यांच्या खेळीचे श्रेय जैस्वालला दिले हे एक महान खेळाडूचेच लक्षण आहे. गुजरात टायटन्स संघाच्या खेळाडूंसह रोहित शर्माने देखील वैभव सुर्यवंशीचे कौतुक केले आहे.