रायगडात राजकीय वातावरण तापले… महाराष्ट्र दिनाचे झेंडावंदन ठरला कळीचा मुद्दा…

0
17

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-  

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण देखील तापले आहे.

महाराष्ट्र दिनी रायगडचे मुख्य ध्वजारोहण करण्याची संधी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना दिल्याने रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. रायगड मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करू लागले आहेत. पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल , कधी होईल तेंव्हा होईल पण यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश शिंदे यांनी केलीय. प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे यावेळचा मान भरत गोगावले यांचाच असल्याचा दावा सुरेश महाडिक यांनी केलाय. आम्ही अडीच वर्षापूर्वी जो उठाव केला होता तो याच कारणासाठी होता याची आठवण त्यांनी करून दिली. जर आमचा मान आम्हाला मिळाला नाही तर शिवसैनिक पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशाराही महाडिक यांनी दिलाय.