कर्जत नगरपरिषद हद्दीतील आमराई शौचालयाची अवस्था बिकट… शौचालयात अस्वच्छतेचे साम्राज्य..स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे

0
17

कर्जत शिवसत्ता टाइम्स (नरेश जाधव):- 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ कर्जत…सुंदर कर्जतचा नारा देण्यात येत असला तरी लाखों रुपये खर्च करूनही कर्जतकरांना चांगल्या सुविधा व स्वच्छ, सुंदर,आरोग्यदायक सुविधा मिळत नसल्याचे चित्र आज ही स्पष्ट दिसून येत आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीतील वॉंर्ड क्रमांक 3 आमराई परिसरात नागरीकांसाठी शौचालय बनविण्यात आले असून या शौचालयातील अतिशय दुरावस्था झाली आहे. गेले अनेक महिने सुविधांपासून वंचित असलेल्या या शौचालयाबाबत ठेकेदार, आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी सर्वच उदासिन असल्याचे पहावयास मिळत आहे. गुगल मॅपवर शौचालयांची माहिती देण्यात आल्याचा डंका पेटविण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या शौचालयात सुविधा देणेच कर्जत नगर परिषद प्रशासन विसरले की काय असा प्रश्न देखील येथे उपस्थित केला जात आहे.

येथील स्थानिक रहिवाशांनी यांनी सांगितले की, या शौचालयातील अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले असून गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी पाणी नाही, पाईप फुटल्यानंतर कठडे तोडण्यात आले होते परंतु पाईप दुरूस्तीनंतर सदर कठडा देखील बनविण्यात आला नाही. तो ज्या पध्दतीने तोडण्यात आला होता, तसाच आजही आहे. सदर शौचालय उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असल्याने यातील घाण पाणी या नदीपात्रात जात असल्याचे नागरीकांनी सांगितले.

स्वच्छता कर्मचारी या शौचालयाकडे साधा ढुंकून सुध्दा पाहत नाहीत. गेल्या अनेक महिन्यापासून या भागात झाडझुड अथवा स्वच्छता झालेली नाही. पाणी नसल्याने कधी-कधी दुर्गंधी देखील पसरते. या भागातील नागरीकांच्या आरोग्याबाबत कर्जत नगर परिषद प्रशासन उदासिन असल्याचे यातून दिसून येत आहे. असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.तरी या शौचालयाची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी, शौचालयात तुटलेले नळ, पाइप दुरुस्त करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, काही ठिकाणी डागडुजी करून पडझड रोखावी…त्याच प्रमाणे आमराई परिसरातील या शौचालयाच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी स्थानिक नागरीक किवा युवकांवर देण्यात यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व अविनाश संजय जाधव यांनी केले आहे.