श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-
कोकण मराठी साहित्य परिषद, श्रीवर्धन शाखेचा २१ वा वर्धापन दिन अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी श्री दत्त मंदिर सभागृह येथे कलामंदिर ग्रुप, महाडच्या ‘स्वरमयी शाम’ या कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला… कार्यक्रमास को. म. सा. प. रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ व समन्वयक अ. वि. जंगम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते… त्यांचे हस्ते गणेश पूजन झाल्यावर श्री.शेठ व जंगम यांनी साहित्यिक मार्गदर्शन करुन श्रीवर्धन शाखेच्या कार्याचे कौतुक केले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रसाद जोशी यांनी केले… तद्नंतर महाड येथील प्रसिद्ध गायक धनंजय भाटे यांच्या प्रमुख-त्वाखालील कलामंदिर ग्रुप, महाड प्रस्तुत ‘ स्वरमयी शाम’ हा बहारदार गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला… कार्यक्रमात धनंजय भाटे, श्रृती रिसबूड, समीर जोशी, या गायकांनी हिंदी, मराठी भावगीते, नाट्यगीते, अभंग सादर करुन रसिक श्रोत्यांची उत्तम दाद मिळविली… त्यांना कौस्तुभ नागवेकर, सिद्धेश जोशी यांनी तबल्याची सुरेख साथ केली तर निलेश ओक यांनी गीतांस अनुरूप असे सूत्रसंचालन केले… गायकांनी सुरत पियाकी छिन बिसुराये, उदे ग
अंबाबाई, तोच चंद्रमा नभात, धुंद एकांत हा, या सुरांनो या, गुंतता ह्रदय हे, बाजे मुरलिया बाजे, कर्तव्याने घडतो माणूस, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा इ.गीते अत्यंत बहारदार गायली… धनंजय भाटे यांनी गायलेल्या तराण्याने वन्स मोअर मिळविला… शेवटी सर्व कलाकारांनी प्रभावी- पणे गायलेल्या स्वा. सावरकर यांच्या अजरामर झालेल्या ‘जयोस्तुते’ ने कार्यक्रमाची सांगता झाली… अध्यक्षा सौ. सीमा रिसबूड यांनी केलेल्या ऋणनिर्देशानंतर कार्यक्रम समाप्त करण्यात आला…