उरण तालुक्यात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर… 

0
21

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून तालुक्यातील अनेक भागात दिनांक २ मे रोजी मध्यरात्री जोरदार कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे… पोलीसांची थाप ही संशयित रहिवाशांच्या दरवाजावर पडल्याने व परप्रांतीय रहिवाशांची झाडाझडती पोलीसांनी सुरु केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे…

मंगळवारी पहलगामच्या बैसरान खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला… त्यात पनवेल, कल्याण डोंबिवली सह इतर ठिकाणचे बहुतांश पर्यटक होते… या हल्ल्याची जबाबदारी दी रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने स्वीकारली आहे… तिला पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा भारताचा आरोप आहे… दहशतवाद्यांच्या साथीदारांना जेरबंद करण्यात आले… उरण हा तालुका मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर येत असल्याने खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत…

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी उरण तालुक्यातील परदेशी नागरिक, परप्रांतीय नागरिक तसेच संशयित वस्तू यांची तपासणी करण्यासाठी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून गुरुवारी मध्यरात्री जोरदार कोंम्बिंग ऑपरेशन राबवून शोध मोहीम सुरु केली आहे… तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व परप्रांतीय नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे… सुरक्षिततेच्या दुष्टीने एकंदरीत अचानक झालेल्या आणि शिस्तबद्ध वातावरणात झालेल्या झाडाझडतीच्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसणार असल्याचा विश्वास अनेक स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे… तसेच परप्रांतीय भंगारवाल्यांचे बस्तान उध्वस्त करावे, अशी मागणी सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे…

उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात किनारपट्टी लाभल्याने ही मोहिम अधिक प्रभावी ठरावी यासाठी ३ पोलीस अधिकारी, ३० अंमलदार यांच्या माध्यमातून परप्रांतीय नागरिकांची झाडाझडती सुरु केली असून, परदेशातील नागरीकांचा शोध सुरू केला आहे… तसेच संशयित व्यक्ती, संशयास्पद वस्तु यांचीही झाडाझडती कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सुरु केले आहे… तसेच अशा प्रकारची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली आहे….