किहीम ग्रामपंचायत हद्दीतील चोंढी पूल मोजतोय शेवटची घटका… शासनाने दखल घेऊन नवीन पूल लवकरात लवकर उभारावा…

0
149

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील सातिर्जे, बोंबटकरपाडा, कातळपाडा आदी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला पूल हा शेवटची घटका मोजत आहे, याबाबत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी शासनाने याची दखल घेऊन सदर पूल हा नवीन पूल लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सांगितले की, किहीम ग्रामपंचायत हद्दीतील सातिर्जे गावाकडे जाणाऱ्या किहीम व सातीर्जे ग्रामपंचायतीला सदर रस्त्याने जोडणारा तसेच खूप वर्षांपूर्वी बांधलेला हा जुना पूल आहे, हा पूल आज जीर्ण अवस्थेत आला आहे, या पुलाचे प्लास्टर गळून पडत आहे यामुळे पुलाच्या जागोजागी लोखंडी सळया बाहेर पडून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या पुलावरून सातिर्जे, बोंबटकरपाडा, कातळपाडा आदी गावांतील शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, अवजड वाहने आदी मोठ्या प्रमाणात येजा करत असतात…पावसाळ्यात समुद्राच्या भरतीत जर मोठा पाऊस पडतो तेव्हा या पुलावरून पाणी जाते, यासाठी  शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन हा पूल त्वरित नवीन व जास्त उंचीचा बनवावा, अशी मागणी करीत आहे.