रजपे आदिवासी बांधवांची व्यथा; मृतांना मिळत नाही अंतिम सन्मान… मृतदेहांवर नदीकाठी अंत्यविधीची वेळ…

0
9

कर्जत शिवसत्ता टाइम्स (नरेश जाधव):-

कर्जत तालुक्यातील जामरुख रजपे येथील आदिवासी वाडीत सुमारे ४० ते ५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. मागील ४-५ वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे या वस्तीतील स्मशानभूमी नदी पाण्यात वाहून गेली. त्यानंतर आजतागायत या वाडीत स्मशानभूमी उपलब्ध झाली नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मृत व्यक्तींचा अंत्यविधी नदीकिनारी उघड्यावरच करावा लागत आहे. उन्हातान्हात,पावसापाण्यात अशा कठीण परिस्थितीतही मृतदेहांचा अंत्यविधी उघड्यावरच केला जात आहे.यामुळे केवळ सामाजिक वेदना नव्हे, तर मृत व्यक्तीच्या सन्मानावरही आघात होत आहे.

या संदर्भात आदिवासी बांधवांनी अनेकदा रजपे ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले. ग्रामपंचायतीने देखील सभेत स्मशानभूमी उभारण्यासाठी ठराव संमत केला आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे.स्थानिक आदिवासींचा आरोप आहे की, ग्रामपंचायतीकडून निवडणूक काळातच त्यांची आठवण काढली जाते, त्यानंतर मात्र त्यांची समस्या दुर्लक्षित केली जाते.

देशभर स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात असताना, रजपे आदिवासी समाज अजूनही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, हे दुर्दैवी वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे.या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल का? आदिवासी समाजाच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील का? असा सवाल आता उपस्थित होतो आहे.