रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करीत बेछूट गोळीबारात रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील दिलीप देसले यांच्यासहित पंचवीसहून अधिक पर्यटकाचा नाहक बळी गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत.या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मांडवा पोलिसांनी सुरक्षा रक्षक यांच्या मदतीने फोकस नामक सागरी सुरक्षा कवच दरम्यान दोन डमी दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात यश प्राप्त झाले आहे.
१२मार्च १९९३ साली दुपारी दीड वाजता पहिला बॉम्ब स्फोट मुंबई शहरातील स्टॉक एक्सचेंज येथे झाला…त्यानंतर अकरा झवेरी बाजारासहित अकरा ठिकाणी असे बारा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोट साठी लागणारे आर डी एक्स,ए के ४७ बंदुकासहित इतर साहित्य हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रकिनारी उतरवून ते साहित्य रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मुंबईत पाठवण्यात आले होते.तसेच २६नोव्हेंबर २००८ साली
पाकिस्तानी बंदूकधारी अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसले आणि मुंबई येथे पाकिस्तानी अतिरेकी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला होता त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांसहित अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. यावेळी सुद्धा कसाब आणि त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे मुंबई येथील कुलाबा बंदरात उतरून त्यांनी मुंबईत प्रवेश केला होता.हे दोन्ही हल्ले समुद्रमार्गे साहित्य आणि अतिरेकी आले असल्याने राज्यातील समुद्र मागें भविष्यात हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनाऱ्यांचे बळकटीकरण व्हावे यासाठी सागरी सुरक्षा कवच हे अभियान वर्षातून दोन ते तीन वेळा आयोजित करण्यात येतात.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका जिल्हा सहित देशाला होवू नये यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या दिवशी फोकस नामक सागर सुरक्षा कवच (मॉक ड्रील)आयोजन करण्यात येत आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून समुद्रमार्गे काही अंतरावर असणाऱ्या रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलिस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फोकस नामक सागर सुरक्षा कवच (मॉक ड्रील) आयोजन केले होते.
यावेळी मुंबईचे प्रवेश द्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथून मालदार कंपनीची प्रवासी बोट सुमारे 180 प्रवासी घेऊन मांडवा बाजूकडे निघालेले असता बोटीत कासा खडकाजवळ दोन दहशतवादी घुसले होते व त्यांनी सदरची बोट ताब्यात घेतलेली आहे.अशी माहिती मिळताच सदर तात्काळ सागरी गस्तीकरता असणाऱ्या खांदेरी बोटीचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांना सदर मालदार बोटीचा पाठलाग करून बोट मांडवा जेट्टी येथे सुरक्षित घेऊन येणेबाबत सूचना करण्यात आली.सदर वेळी बोट मांडवा जेट्टी येथे येताच तात्काळ मांडवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई आणि शस्त्रधारी सुरक्षा रक्षक यांच्यासहित बोटीत घुसून सदर दोन्ही डमी अतिरेकी यांना यांना ताब्यात घेऊन त्यांना मांडवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना मंगळवारी(दिनांक १३मे रोजी) घडली. मात्र, दोन अतिरेकी पोलिसांनी पकडले याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली होती.मात्र ही प्रत्यक्ष घटना नसून, मांडवा सागरी पोलिसांमार्फत मॉक ड्रील घेण्यात आल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
त्याचवेळी मांडवा बोर्ड वॉक हॉटेल येथे एक आतंकवादी घुसून त्याने तेथील लोकांना ओलीस ठेवले आहे अशी माहिती मिळाली असता तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई व शस्त्र धारी कर्मचारी बोर्डवॉक हॉटेल येथे जाऊन तेथील किचनमध्ये लपलेला तिसरा संशयित डमी आतंकवादीस पकडून त्याला सुद्धा मांडवा पोलिस ठाण्यात नेण्यात आलेले आहे.व जखमी नागरिकांना रुग्णवाहिका द्वारे दवाखान्यात पुढील उपचारकामी पाठवण्यात आलेले आहे. सदरवेळी उपस्थितांना मॉक ड्रिल बाबत पूर्ण माहिती देऊन अशा आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची दक्षता व काळजीबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.
सकाळी सव्वा अकरा ते साडेबारा या सव्वा तासाच्या कालावधीत हा थरार सुरु होता. सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला.यामध्ये मांडवा सागरी पोलीस ठाणे व कोस्टल अभियान बंदोबस्ताकरिता असणारे पाच अधिकारी, 18 अंमलदार व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभाग अधिकारी आशिष मानकर, अंमलदार तसेच पोर्ट एलएलपी व्यवस्थापन कर्मचारी व खासगी रुग्णालय विभाग असे एकत्र सहकार्याने मॉक ड्रिल पूर्ण करण्यात आला.