वरसे ग्रामपंचायतीकडून पत्रकाराला लाच देऊन बातमी थांबवण्याचा प्रयत्न… पत्रकार समीर बामुगडे यांचा ठाम नकार…

0
32

रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):- 

14 मे रोजी वरसे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जे घडलं, त्याने निवी गावाच्या जनतेच्या मनात प्रचंड संताप निर्माण केला. ग्रामपंचायत विभाजनावर चर्चा सुरु होती. वरसे आणि भुवनेश्वर गावांचा उल्लेख अगदी ठळकपणे झाला. पण निवी गावाचं नाव कुठेच नव्हतं. ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी यांचाही काहीच उल्लेख नाही. हे फक् दुर्लक्ष नव्हतं, तर निव्वळ अपमान होता — गावाच्या अस्तित्वावरच एक प्रश्नचिन्ह उभं करणारं कटकारस्थान.

ही गोष्ट तिथेच थांबली नाही. पत्रकार समीर बामुगडे यांनी ही बाब ओळखली. त्यांनी गावकऱ्यांच्या मनातला राग आणि अन्यायाविरोधात उफाळून येणारा आवाज बातमीच्या रूपात मांडला. बातमी प्रकाशित होताच गावात खळबळ उडाली. निवी गाव एकवटलं. गावकऱ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली — आमचं नाव का काढलं गेलं नाही? आम्ही नागरिक नाही का? विकासाच्या योजनांमधून आम्हाला कायम डावलायचं का?

हे सारे घडत असतानाच, काही राजकीय मंडळींची हालचाल सुरू झाली. समीर बामुगडे यांना संपर्क करून, ही बातमी थांबवण्यासाठी ‘ऑफर’ दिली गेली. सोप्या भाषेत सांगायचं तर — लाच देऊन सत्य दाबण्याचा प्रयत्न झाला. पण समीर बामुगडे यांनी ती ऑफर तिरस्काराने फेटाळली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, “गावाच्या स्वाभिमानावर सौदा होणार नाही. मी पत्रकार आहे, माझं कर्तव्य सत्य समोर मांडणं आहे. हे काम मी जबाबदारीने करतो आणि करत राहीन.”

गावकऱ्यांना जेव्हा ही माहिती समजली, तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी थेट ग्रामपंचायतीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं — ही केवळ एक योजना नाही, हा सरळसरळ भेदभाव आहे. गाव डावललं जातंय आणि त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला गप्प बसवण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला जातोय? मग या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे? याचा संबंध थेट संपूर्ण ग्रामपंचायतीशी आहे का? गावकऱ्यांनी आता मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. केवळ समीर बामुगडे यांना ऑफर देणाऱ्या लोकांचीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामपंचायतीच्या कारभाराची तपासणी झाली पाहिजे. “जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा ठाम आवाज गावातून उठतोय.

ग्रामसभा बहिष्काराचा निर्णयही याच संतापातून आला आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, जोपर्यंत प्रशासन सार्वजनिक माफी मागत नाही, तोपर्यंत ग्रामसभा घेण्यास तीव्र विरोध केला जाईल.समीर बामुगडे यांच्या भूमिकेवर गावकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, “ही लढाई केवळ माझी नाही. हे संपूर्ण गावाच्या अस्तित्वाचं प्रकरण आहे. शेवटपर्यंत मी या अन्यायाविरुद्ध लढत राहणार.”

निवी गावाच्या या संघर्षात आता फक्त एक गाव नाही, तर लोकशाहीसाठी उभं राहिलेलं समाजप्रबोधनही दिसत आहे. सत्यासाठी उभं राहणं, तेही लाच आणि दबावाच्या विरोधात — ही केवळ पत्रकारिता नाही, तर एका गावाच्या स्वाभिमानाची लढाई आहे.