विस्मयजनक दृश्य…आभाळातून आले जलजीव?… पहिल्या पावसात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार उघड … 

0
19

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या खांदाड गावात नुकत्याच पडलेल्या पहिल्या पावसाने निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार उघड केला आहे. मंगळवारी, 20 मे रोजी दुपारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे गावातील एका जुन्या, नैसर्गिक तलावात अचानक हजारो मासे प्रकट झाले! हे मासे दीड ते पाच किलो वजनाचे असून तलावाच्या पाण्यात जलद गतीने हालचाल करताना दिसले. सकाळी लवकरच ही घटना गावभर वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि पाहता पाहता शेकडो ग्रामस्थ, आजूबाजचे रहिवासी आणि प्रवासी या दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तलावाच्या काठावर जमले. सर्वांच्या मनात एकच प्रश्न – “हे मासे कुठून आले?” कारण गावातील हा तलाव कोणत्याही नदी, नाल्याशी जोडलेला नाही. मागील कित्येक दशकांमध्ये अशी घटना कधीही घडलेली नव्हती. त्यामुळे अनेकांनी याला निसर्गाचा चमत्कार मानले, तर काहींनी विचार मांडला की ढगातून पडणाऱ्या पावसाच्या माध्यमातून मासे तलावात आले असावेत का? या दृश्यावरून असेही वाटते की खांडाडचा तलाव हा जणू आकाश-भूमी संगम बिंदूप्रमाणे कार्य करत असून आभाळातून जीवन तलावात उतरल्याचा भास निर्माण करतो.जमिनीखाली सुप्त अवस्थेत असणारे मासे आणि बेडूक, पावसाळा सुरू होताच जागृत होतात, अशी शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः काही जातींचे मासे आणि बेडूक हे दमट जमिनीत दीर्घकाळ टिकून राहतात, हे विज्ञान दृष्ट्या सिद्ध आहे. पाण्यात फक्त मासेच नाही, तर मोठ्या प्रमाणावर पिवळ्या रंगाचे मोठे बेडूकही दिसून आले. त्यांच्या एकसुरी डरकाळ्यांनी संपूर्ण परिसरात एक नाट्यमय, थरारक वातावरण निर्माण केले. काही वेळाने तलावाजवळील रस्त्यावर कुत्र्यांचा एकच गोंधळ झाला. काहींनी पाण्यात उडीही मारली. त्यानंतर लक्षात आले की एक मोठा पाणसाप एका बेडुकाची शिकार करत होता, आणि त्यातूनच तो रहस्यमय आवाज येत होता. ही घटना बघून काही युवकांनी काठ्यांच्या सहाय्याने मासे पकडण्यास सुरुवात केली. शेकडो मासे पोत्यांमध्ये भरून नेण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत हे दृश्य सुरू होते. यावरून या घटनेची व्यापकता आणि मास्यांची संख्या लक्षात येते. या तलावात मागील दोन वर्षांपासून मगर असल्याच्या बातम्या होत्या.मात्र यंदा उन्हाळ्यात तलाव पूर्ण कोरडा पडल्याने मगर निघून गेल्याचे मानले जाते.पण तिच्या अनुपस्थितीतच मास्यांचा अचानक उगम,आणि बेडूकांची भरघोस उपस्थिती—या साऱ्यांमुळे गावात ही ओळ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे…“मगर गेले आणि मासे आले!” तलावात आजही शेकडो कासवांचे शांत व वास्तव्य आहे, जे कुणालाही सहज दिसत नाहीत. खांडाडच्या या नैसर्गिक विस्मयकारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू आहे — “ही निसर्गाची करामत,की अद्याप न उलगडलेलं गूढ?” याचे नेमके उत्तर पुढील वैज्ञानिक अभ्यासातूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत खांदाडच्या तलावाचे हे विस्मयजनक दृश्य आभाळातून आले जलजीव?सर्वांसाठी एक आकर्षण बिंदू ठरत आहे.