पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करतोय मात्र आजही रायगडच्या पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडीसारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय, या गावाला हक्काचा रस्ताच नाही, ही मोठी शोकांतिका आहे. पिढ्यान पिढ्या, वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासनदरबारी चपला झिजवल्या पण रस्ता काही मार्गी लागलाच नाही. रस्त्या अभावी गावकऱ्यांचे अतोनात हाल होतायत, येथील विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण व वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुट्याची व खडतर वाट तुडवत जावे यावे लागतेय. पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होते. सर्प व कीटक यांपासून त्यांच्या जीवाला धोका जाणवतोय. रस्त्याअभावी येथील मुले शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर घर सोडून इतरत्र राहता येत, तर गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंगोशी गावापर्यंत येण्यासाठी येथील रुग्ण व गर्भवती महिलांना झोळीतून आणण्याची नामुष्की ओढवते. रस्त्यासाठी अनेकदा लढे आंदोलन उपोषण झाली मात्र रस्त्याच्या प्रश्नावर तालुका व जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचेच दिसून आलेय. रस्त्याअभावी मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणी व संकटांना सामोरे जावे लागतेय, अशावेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय, अखेर अनेक प्रयत्नाअंती भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगाने जागेची मोजणी करण्यात आलीय, लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून गावकऱ्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जोर धरतेय, जर रस्त्याचा प्रश्न जलदतेने सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिलाय.