आश्चर्यकारक…चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल… बागमांडला ते वेश्वी पुलाच्या कामामुळे रस्त्यावर चिखलच चिखल…

0
14

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (प्रसाद बारे):- 

हरिहरेश्वर बागमांडला मुख्य रस्त्यावर सध्या ‘चिखलच चिखल’ या दोन शब्दांत चित्र रंगवता येईल.बागमांडले दांडा ते बानकोट ब्रिज दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे या भागातील रस्ता अक्षरशः दलदलीत परिवर्तीत झाला आहे. काम करणारी अशोका बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी नागरिकांच्या जिवाशी सरळ सरळ खेळ करत आहे.

या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी प्रचंड धोका निर्माण झाला आहे. रस्ता चिखलात बुडाल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे. विशेषतः हरिहरेश्वर येथील देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपतालुका प्रमुख यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आमचा कोणत्याही विकास प्रकल्पास विरोध नाही, पण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. हा रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रण आहे. कंपनीकडे कोणतंही नियोजन नाही.”

अशोका बिल्डकॉन लिमिटेडची ही कार्यपद्धती म्हणजे निष्काळजीपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. सार्वजनिक रस्त्यांवर काम करताना सुरक्षेच्या उपाययोजना, अपघात टाळण्यासाठीची खबरदारी आणि स्थानिकांशी समन्वय हे अत्यावश्यक असताना कंपनीने या सर्व बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या कंपनीवर कारवाई केली नाही, तर भविष्यात जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे.