मुरुड जंजिरा शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
सतत कोसळणाऱ्या पूर्व मान्सूनमुळे दत्त मंदिर जवळील डोंगराला भगदाड पडुन काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले असुन एसटी डेपो व परिसरात गटारे दुथडी वाहू लागल्याने रस्तावर फुटभर पाणी वाहत असल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली..कालपासुन संततधार पाऊस कोसळत असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे…
मुरूड तालुक्यात ढगफुटी झाली असुन मे महिन्यात विहिरी,नदी ,नाले दुथडी वाहत असुन मुरुड शहरातील गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे…समुद्राला भरती असल्याने नद्यांचे पाणी उलटल्याने मुरुडसह मुरुड मंडळातील लक्ष्मीखार,उंडरगाव,
शिघ्रे येथील घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे . काल रात्री मौजे तेलवडे येथे मातीचे धस कोळसुन एका घराचे नुकसान झाले तर उंडरगाव येथे 4/5 घरांमध्ये पाणी घुसल्याने ग्रामस्थ चिंतीत आहेत…आगरदांडा येथील बौद्ध स्मशान भूमीची भिंत कोसळल्याची घटना घडली.तर मिठागर येथे डोंगराची माती खचल्याने चंद्रकांत ठाकूर यांच्या पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.लक्ष्मीखार ग्रामस्थांना दरवर्षी प्रमाणे यंदाही पूर्व मान्सूनचा तडाखा बसला…सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे . डोंगरातून वाहत असलेली नदीच्या प्रवाहाचा मार्ग गाळ काढून स्वच्छ केल्यास कायमची ददात मिटेल असे मत आगरी समाज अध्यक्ष प्रविण बैकर यांनी व्यक्त केले…
या कामी मुरुड नगरपरिषदेकडुन 8 कोटींचा निधी मंजूर झाल्याची त्यांनी माहिती दिली…लक्ष्मीखार येथील नागरिकांची ही दरवर्षी होणारी त्रेधा तिरपिट थांबली पाहिजे अशी मागणी होत आहे.शिघ्रे गावात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मोरीचे काम सुरू असल्याने गटाराचे पाणी आटल्याने अंदाजे 55 ते 60 घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याची माहिती मुरुड मंडळ अधिकारी कचरे यांनी दिली.सुवर्णा शिपिंग कंपनी व दिघी जलवाहतुक कंपनीची आगरदांडा जंगल जेट्टी सेवा तीन नंबरचे निशाण दाखवल्याने आज बंद असल्यामुळे श्रीवर्धन व म्हसळा जाणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची गैरसोय झाली.
पाऊस थांबण्याची शक्यता नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.रेड अलर्ट दिल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .मुरुड शहरातील विहीरी मे महिन्यात भरण्याची घटना 60 वर्षात प्रथमच अनुभवल्याचे गणेश पाखाडीतील ज्येष्ठ नागरिक सुरेश वर्तक यांनी सांगितले …मुरुड प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहे.तथापि पाऊस थांबल्या नंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल.सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही मात्र नुकसानग्रस्तांना योग्य पद्धतीने पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे…